मुंबई : अंतिम वर्षांच्या परीक्षा कशा आणि कधी घेता येतील यासाठी कुलगुरूंची समिती गठित करण्यात आली आहे. आज, रविवारी सकाळी ११ वाजता या समितीची बैठक होणार आहे.
समितीने अहवाल सादर केल्यावर राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून परीक्षा कधी घ्यायच्या याचा निर्णय घेतला जाईल, असे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली अंतिम वर्षांच्या परीक्षेसंदर्भात १३ अकृषी विद्यापींठाच्या कुलगुरूंसोबत ऑनलाइन बैठक झाली.
सर्वोच्च न्यायालयाच्या परीक्षेसंदर्भातील निर्णयानुसार राज्यातील अंतिम वर्षांच्या परीक्षा कधी आणि कशा एका समान पद्धतीने घेता येतील याचे नियोजन करणे गरजेचे आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) मार्गदर्शक सूचनांनुसार ३० सप्टेंबपर्यंत परीक्षा घेणे शक्य आहे का, याबद्दलही विचार करावा, अशा सूचना सामंत यांनी दिल्या आहेत.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) मार्गदर्शक सूचनांचा विचार करून परीक्षा कशा आणि कधी घेता येतील यावर आज समितीची बैठक होऊन अहवाल सादर होईल.
समितीच्या निर्णयानंतर कुलपती राज्यपाल आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून परीक्षेबाबतचा अंतिम निर्णय लवकरच जाहीर करण्यात येईल.
विद्यार्थ्यांची परीक्षेसंदर्भातील मानसिकता लक्षात घेऊन कमीत कमी संसाधनांमध्ये आणि सहज आणि सोप्या पद्धतीने परीक्षा कशा घेता येतील यासाठीचा अभ्यास करण्यासाठी कुलगुरूंची एक समिती गठित करण्यात आली आहे.