सांगली: कोरोनाबाधितांची संख्या कमी असलेल्या झोनमध्ये रात्री ८ वाजेपर्यंत दुकानं सुरू ठेवण्यासाठी आज आदेश काढला जाईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे CM Uddhav Thackeray यांनी सांगलीमधील पत्रकारपरिषदेत आज सोमवार (२ ऑगस्ट) बोलताना सांगितलं आहे.
ज्या जिल्ह्यांमध्ये रूग्ण वाढ कमी होत नाही. त्या जिल्ह्यात मात्र हे निर्बंध असेच राहतील. त्यामुळे काही गोष्टींमध्ये शिथिलता जिथे करणं शक्य आहे, तिथे आम्ही करतो आहोत. जिथे करणं थोडसं अवघड आहे, तिथल्या नागरिकांनी सहकार्य करण्याची गरज आहे. असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, आपत्तीग्रस्तांना तत्काळ मदत देणं सुरू झालंय, कायमस्वरूपी तोडगा करण्यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागतील. लाखो लोकांचं स्थलांतर करण्यात प्रशासनाल यश आलं आहे. कमी कालावधीत जास्त पाऊस पडल्याने आपत्ती ओढावली आहे.
काही वस्त्यांचं पुनर्वसन आवश्यक, नागरिकांनी यामध्ये सरकारला सहकार्य करण्याची गरज आहे. निसर्गासमोर आपण हतबल आहोत. असं देखील सांगितलं. सांगलीतील पूरग्रस्त भागांचा मुख्यमंत्र्यांनी आज आढावा घेतला. यानंतर आयोजित पत्रकारपरिषदेत ते बोलत होते.
याचबरोबर, ”मी दोन-चार दिवसांपासून सर्वांना सांगतोय की काही ठिकाणी काही प्रसंगी कठोर निर्णय हे आपल्याला घ्यावे लागतील. याचा अर्थ असा आहे की आतापर्यंत आपण आपली कामं, ज्याला आपण विकास कामं म्हणतो ती करत गेलो.
पण ही आता आपत्ती आणि आपत्तीची वारंवारता जर आपण पाहिली, तर आपत्तीचं स्वरूप हे अधिकाधिक भीषण होत चाललेलं आहे. काही दिवसांचा काही महिन्यांचा पाऊस हा काही तासांत किंवा एक दिवसात पडायला लागलेला आहे. प्रचंड प्रमाणात अतिवृष्टी होते आहे. दरडी कोसळत आहेत, रस्ते खचत आहेत.” असं यावेळी मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवलं.
सांगली जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे मोठं नुकसान झालं आहे. हजारो कुटुंबांना फटका बसला असून घरासह व्यवसायाचं नुकसान झाले आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले असून पिकेही वाया गेली आहेत.
काही ठिकाणी जमिनीची मोठ्या प्रमाणात धूप झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगलीतील भिलवडीला भेट दिली. दरम्यान, या संकटातून मार्ग काढणारचं, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.