मुंबई: कर्नाटक, शेतकरी नुकसान भरपाई प्रकरण, बेरोजगारी, महागाई, उद्योग, यासह अनेक घडामोडी घडत आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील ४० गावांनी कर्नाटकमध्ये सामील होण्याचा ठराव केला आहे. या ठरावावर आम्ही गांभीर्याने विचार करत आहोत, असे विधान केले आहे. दिशा सालीयन प्रकरणावरून राणे, भाजपाकडून झालेली ठाकरे कुटुंबियांची बदनामी, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान यासह अनेक मुद्यावर माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे याविषयावर सायंकाळी 5 वाजता पत्रकारांशी संवाद साधणार आहे.
बोम्मई यांच्या या विधानानंतर राज्यात संताप व्यक्त केला जात आहे. याच मुद्द्यावरून विरोधी बाकावरील पक्षांनी राज्यातील शिंदे गट-भाजपाला लक्ष्य केले आहे. तर महाराष्ट्रातील एकही गाव कर्नाटकमध्ये जाणार नाही, असे आश्वासन सत्ताधाऱ्यांनी दिले आहे. उद्धव ठाकरे गटातील नेते तथा माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची बिहारमध्ये जाऊन भेट घेतली आहे. आदित्य ठाकरेंच्या या बिहार दौऱ्यामुळेही वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.
शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे
आज 5 वाजता अत्यंत महत्वाच्या विषयावर पत्रकारांशी संवाद साधतील.
ठिकाण: मातोश्री pic.twitter.com/dIF824azx8— Sanjay Raut (@rautsanjay61) November 24, 2022
अतिवृष्टीमुळे शेतीमालाचे झालेले नुकसान, शेतकऱ्यांना आर्थिक मदत, सोयाबीन, कापूस आदी पिकांना मिळणारा भाव या मुद्द्यांवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर आक्रमक झाले आहेत. त्यांनी मुंबई येथील अरबी समुद्रात जलसमाधी घेण्याचा इशारा दिला आहे. स्वाभिमानीच्या या आंदोलनाचीही सध्या सगळीकडे चर्चा होत आहे. सर्व विषयांवर उध्दव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.