
मुंबई : नरेंद्र मोदी सरकारने केलेल्या कृषी कायद्यांना (agriculture law) विरोध म्हणून शिरोमणी अकाली दलाने थेट राष्ट्रीय लोकशाही आघाडीतूनच (NDA) बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे. यावरुन शिवसेनेनं पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपवर टीका केली आहे. (Shivsena Criticism On BJP Shiromani Akali Dal going to be out of NDA) ज्या कारणांसाठी एनडीए (NDA) स्थापन झाली ते कारणच मोदींच्या झंझावातात नष्ट झाले हे सत्य स्वीकारुन नवा झेंडा फडकवावा लागेल. अशी टीका शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.
काय आहे सामनाच्या अग्रलेखात
सध्या तरी अकाली दल हा एनडीएचा शेवटचा खांबही कलथून गेला आहे. राष्ट्रीय स्तरावरील हिंदुत्वाचे राजकारणही त्यामुळे निस्तेज होताना दिसत आहे. “महाराष्ट्रात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार उत्तम चालले आहे. हे सरकार पाच वर्ष धावत राहील अशी स्थिती आहे. भविष्यात देशाच्या राजकारणात उलथापालथ घडविणारी आघाडी निर्माण होईल काय? याची चाचपणी सुरुच असते. पण राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून शिवसेनेपाठोपाठ अकाली दलही बाहेर पडल्याने राष्ट्रीय राजकारण बेचव झाले आहे.
काँग्रेस आजही मोठा पक्ष आहे. पण राष्ट्रीय पातळीवर निवडणुका जिंकल्याशिवाय राजकीय मोठेपण सिद्ध होत नाही. ज्या कारणांसाठी एनडीए स्थापन झाली ते कारणच मोदींच्या झंझावातात नष्ट झाले हे सत्य स्वीकारुन नवा झेंडा फडकवावा लागेल. सध्या तरी अकाली दल हा एनडीएचा शेवटचा खांबही कलथून गेला आहे. राष्ट्रीय स्तरावरील हिंदुत्वाचे राजकारणही त्यामुळे निस्तेज होताना दिसत आहे. नवा सूर्य उगवेल काय?” असा प्रश्नही शिवसेनेनं उपस्थित केला आहे.
पंजाबच्या अकाली दलानेही एनडीए म्हणजेच राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा त्याग केला आहे. भाजपशी त्यांची प्रदीर्घ साथसंगत होती, पण ती आता सुटली आहे. अकाली दलाचे सर्वेसर्वा प्रकाशसिंग बादल यांच्या सूनबाईंनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केंद्रीय मंत्रिमंडळातून आधीच राजीनामा दिला. तेव्हा बरे झाले राजीनामा दिला. सुंठीवाचून खोकला गेला याच आविर्भावात अकाली दल मंत्र्यांचा राजीनामा तडक स्वीकारण्यात आला.
अकाली दलाचे मन वळवले जाईल, अशी टोकाची भूमिका घेऊ नका असे त्यांना सांगितले जाईल. पण तसे काहीच घडले नाही. आता तर बादल हे राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडले आहेत. तरी त्यांना थांबवण्याच्या प्रयत्न होऊ नये याचे आश्चर्य वाटते. आणखी एक जुना, सच्चा साथीदार सोडून गेल्याबद्दल भाजपने अश्रूंची दोन टिपंही गाळली नाहीत. आधी शिवसेनेला एनडीएतून बाहेर पडावे लागले. आता अकाली दल बाहेर पडले. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे दोन प्रमुख स्तंभच बाहेर पडल्याने या आघाडीचे म्हणजे एनडीएचे अस्तित्व खरोखर उरले आहे का? या आघाडीत नक्की कोण कोण आहेत, हा संशोधनाचा विषय आहे. जे आहेत, त्यांचा हिंदुत्वाशी नक्की किती संबंध आहे? असे अनेक सवाल शिवसेनेनं भाजपला विचारले आहे.
आघाडीत अनेक चढउतार आले. सत्ता आली, सत्ता गेलीत. अनेक घटक पक्ष सोयीनुसार सोडून गेले. पण एनडीएचे दोन खांब भाजपबरोबर राहिले ते म्हणजे शिवसेना आणि अकाली दल. आज या दोन्ही पक्षांनी एनडीएला राम राम ठोकल्याने एनडीएत खरच राम उरला का, पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने दोन सार्वत्रिक निवडणुका जिंकल्या. अनेक राज्यात त्यांची सत्ता आहे. जेथे अल्पमत होते, तेथेही या ना त्या मार्गाने सत्ता मिळविली. केंद्रीय सत्तेचे बाहुबल हाती असेल की, काहीच अशक्य नसते, पण सत्तेचे गड जिंकले तरी एनडीएतील दोन सिंह मात्र गमावले आहेत, हे वास्तव कसे नाकारणार? असा टोलाही शिवसेनेनं लगावला आहे.