कोल्हापूर: शिंदे सरकार कोसळणार? या संजय राऊतांच्या दाव्यावर जोरदार चर्चा चालू आहे. यावेळी संजय राऊतांच्या विधानावरही शरद पवारांनी (Sharad Pawar) प्रतिक्रिया दिली आहे. “राज्यातील शिंदे सरकार (Shinde Government) फेब्रुवारी महिन्यात कोसळेल. हे सरकार फेब्रुवारी महिना पाहणार नाही”, अशा आशयाची विधानं संजय राऊतांनी केली आहेत. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोल्हापुरात पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारणा केली असता शरद पवारांनी त्यावर सूचकपणे मिश्किल टिप्पणी केली. “त्यांचं नेमकं काय नियोजन आहे याबद्दल आता मी गेल्यावर त्यांच्याकडून जाणून घेईन. त्यांचं काही नियोजन असेल, तर त्याबद्दल मला फारशी काही माहिती नाही”, असं शरद पवार यावेळी म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.
तसेच, यावेळी शरद पवारांनी छत्रपती संभाजी महाराजांचा धर्मवीर उल्लेख, बिहारमधील जातीवर आधारित जनगणना अशा मुद्द्यांवरही भूमिका मांडली. “छत्रपती शिवाजी महाराजांनंतर या राज्यावर इतके हल्ले झाले. त्या हल्ल्यांना समर्थपणे तोंड देण्याचं काम संभाजी महाराजांनी केलं. हा इतिहास आहे. त्यामुळे त्यांना स्वराज्यरक्षक म्हणणं यात फारसं काही चुकीचं नाही. त्यावर वाद करण्याचंही काही कारण नाहीये”, असं शरद पवार यावेळी म्हणाले.
“ही मागणी आम्ही फार वर्षांपासून करतोय”
दरम्यान, बिहारमध्ये सुरू झालेली जातीवर आधारित जनगणनेची मागणी आपण गेल्या अनेक वर्षांपासून करत आहोत, असं शरद पवार म्हणाले.”अशी जनगणना करावी, ही मागणी आम्हा सगळ्यांची गेली अनेक वर्षं आहे. सातत्याने आम्ही ती करतोय. समाजातील लहान घटक असला, तर त्याची नेमकी संख्या किती, स्थिती काय या गोष्टींचं मोजमाप एकदा झालं पाहिजे. त्यांना वर आणण्यासाठी वेगळे कार्यक्रम केले पाहिजेत. त्यासाठी ही जनगणना आवश्यक आहे असा विचार आम्ही लोकांनी मांडला आहे. मला आनंद आहे की नितीश कुमारजी यांनी त्याची अंमलबजावणी करायला सुरुवात केली”, असं शरद पवार म्हणाले.