
मुंबई/आर्वी (जि. वर्धा):भाजप संविधानाची पायमल्ली करत ईडी, सीबीआय आणि अन्य केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून विरोधी पक्षांना लक्ष्य करत आहे. लोकशाही मार्गाने निवडून आलेली सरकारे अस्थिर केली जात आहेत. लोकशाही कमकुवत करून देशात हुकूमशाही हा प्रकार असून भारतीय जनता पक्षाचा खरा अजेंडा “वन नेशन, वन पॉलिटिकल पार्टी” हा असून देशात एकपक्षीय व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. असा घाणाघाती हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ Harshvardhan Sapkal यांनी केला आहे.
महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे आयोजित भव्य बहुजन कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी महात्मा फुले यांच्या समता, शिक्षण, सत्यशोधन आणि सामाजिक न्यायाच्या विचारांचा राज्यभर जागर करण्याचा निर्धार करण्यात आला. कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, काँग्रेस कार्यसमिती सदस्य खा. चंद्रकांत हंडोरे, माजी मंत्री यशोमती ठाकूर, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष किशोर कान्हेरे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागाचे उपाध्यक्ष भानुदास माळी, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अनंत मोहोड, वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुनिल कोल्हे, यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिक्षणाच्या माध्यमातून बहुजन समाजाला स्वाभिमान दिला, सावित्रीबाई फुले यांच्या सहकार्याने स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली, शेतकरी, कष्टकरी आणि वंचित समाजाच्या न्यायासाठी संघर्ष केला तसेच सत्यशोधनाचा मार्ग दाखवला. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत गाडगेबाबा यांच्या विचारांशी महात्मा फुले यांच्या कार्याची सांगड घालत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस वर्षभर राज्यभर जनजागृती अभियान राबविणार आहे. गावागावांत व्याख्याने, परिसंवाद, जनसंवाद, विद्यार्थी मेळावे आणि विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून समता, बंधुता, सामाजिक न्याय आणि संविधानिक मूल्यांचा प्रचार केला जाईल, असे त्यांनी सांगितले.
विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यावेळी बोलताना म्हणाले की, संविधान, सामाजिक न्याय आणि बहुजन समाजाच्या अधिकारांवर आज संकट निर्माण झाले आहे. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या आधारे समाजात परिवर्तन घडविण्याची गरज आहे. सत्ताधा-यांच्या मदतीसाठी काही बाबा लोक अंधश्रद्धा पसरवत आहेत. राजकीय फायद्यासाठी सामाजिक विषमता पसरवली जात आहे. शेतकरी, बेरोजगारी आणि महागाईच्या हे अत्यंत ज्वलंत प्रश्न असून जनतेच्या हितासाठी व संविधानाच्या रक्षणासाठी व्यापक जनआंदोलन उभारण्याचे आवाहन त्यांनी केले.
काँग्रेस कार्यसमिती सदस्य चंद्रकांत हंडोरे यांनी जातीय आणि धार्मिक ध्रुवीकरणाच्या राजकारणावर टीका करत महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या समतावादी विचारांचा प्रसार करण्याची गरज व्यक्त केली. महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षण, सामाजिक समता आणि मानवतावादासाठी दिलेले योगदान समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी ओबीसी समाजाच्या प्रश्नांवर भाष्य करताना अनेकांनी ओबीसी समाजाच्या नावाचा वापर करून स्वतःची राजकीय उंची वाढवली आणि सत्तेची शिखरे गाठली, मात्र ओबीसी समाजाला न्याय आणि विकासापासून वंचित ठेवले, अशी टीका केली. ओबीसी समाजाचा केवळ राजकीय वापर करण्यात आला, परंतु त्यांच्या शिक्षण, रोजगार, सामाजिक आणि आर्थिक प्रगतीसाठी अपेक्षित काम झाले नाही. काँग्रेस पक्ष हा सत्तेपेक्षा समाजाच्या बाजूने उभा राहणारा पक्ष असून, “आम्ही सत्तेसोबत नाही, समाजासोबत आहोत,” असा ठाम संदेश त्यांनी दिला.
इतर मान्यवरांनीही या कार्यक्रमाला मार्गदर्शन करताना महात्मा फुले यांच्या विचारांमुळे त्यांनी राबविलेल्या चळवळीमुळे मागासांना मुख्य प्रवाहात जागा मिळाल्याचे सांगितले. कार्यक्रमात महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांवर आधारित राज्यव्यापी वैचारिक चळवळ उभारण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत गाडगेबाबा यांच्या समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या विचारांचा प्रसार गावागावांत करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी वर्षभर सक्रियपणे काम करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
जनतेनेही मोठ्या प्रमाणात पुढे येण्याची वेळ आली
महाराष्ट्रातील बोगस बियाण्यांच्या प्रश्नावर माध्यमांशी बोलताना सपकाळ म्हणाले की, राज्यात बोगस बियाणे, बोगस पदव्या, बोगस नोकऱ्या, पेपरफुटी आणि विविध घोटाळ्यांनी व्यवस्था पोखरली आहे. बोगस बियाण्यांचे रॅकेट सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादाने सुरू असल्याचा आरोप करत त्यांनी कृषी विभागाने राज्यव्यापी धडक मोहीम राबवून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली. बोगस बियाण्यांच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीने कोणतीही प्रभावी कारवाई केली नसल्याने तिच्या भूमिकेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. काँग्रेस या सर्व प्रश्नांवर राज्यभर आक्रमकपणे आंदोलन करत असून, विरोधी पक्ष म्हणून आपली जबाबदारी पार पाडत आहे. मात्र आता लोकशाही, संविधान, शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या रक्षणासाठी जनतेनेही मोठ्या प्रमाणात पुढे येण्याची वेळ आली असल्याचे सपकाळ यांनी सांगितले. भाजप नेते नितेश राणे यांनी अभिनेता आमिर खान यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना सपकाळ म्हणाले, हिंदुत्वाचे स्वयंघोषित ठेकेदारांनी इतरांना सल्ले देण्यापूर्वी राम मंदिरातील कथित आर्थिक गैरव्यवहार आणि त्यासंदर्भातील प्रश्नांवर उत्तर द्यावे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.








































































































































