कणकवली: जे गाव माझ्या विचारांचा सरपंच देईल, त्या गावाचा मी विकास करेन. पण जर माझ्या विचारांचा सरपंच आला नाही, तर निधी देणार नाही अशी धमकी भाजपा आमदार नितेश राणे यांनी दिली आहे. कणकवलीत बोलताना आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी हे विधान केलं आहे. आपण आता सत्तेत असून, सगळं काही आपल्याच हातात आहे असा इशाराही यावेळी त्यांनी दिला.
“चुकूनही येथे माझ्या विचारांचा सरपंच आला नाही, तर मी एकही रुपयाचा निधी देणार नाही. तितकी काळजी मी नक्कीच घेईन. आता याला हवं तर धमकी किंवा काही समजा. पण आपलं गणित स्पष्ट आहे. त्यामुळे मतदान करताना हे लक्षात ठेवा,” असा इशाराच आमदार नितेश राणे यांनी यावेळी बोलताना दिला.
“सगळा निधी आता माझ्या हातात”
पुढे ते म्हणाले “सगळा निधी आता माझ्या हातात आहे. मग तो जिल्हा नियोजन निधी असो किंवा ग्रामविकास किंवा केंद्राचा निधी असो. मी सत्तेत असणारा आमदार आहे. त्यामुळे पालकमंत्री, जिल्हाधिकारी, संबंधित मंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री कोणीही मला विचारल्याशिवाय नांदगावमध्ये निधी देणार नाहीत”.
हेही वाचा: अनिल देशमुखांना १३ महिन्यानंतर जामीन,जामिनाला दहा दिवसांची स्थगिती!



















































































































































































