
शिर्डी: महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाचा कहर सुरु आहे. या पार्श्वभूमीवर शिर्डीमधील साई संस्थानने Shirdi-saibaba-sansthan-trust साई भक्तांना दर्शनासाठी Darshan पुन्हा एकदा नियम बदलले आहेत. आता सकाळी ६ ते रात्री ९ या काळातच साई भक्तांना दर्शन घेता येणार असून रात्री ९ ते सकाळी ६ अशा ९ तासांसाठी दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय साई संस्थानने घेतला आहे. अहमदनगर जिल्हाधिकाऱ्यांनी नाईट कर्फ्यूची घोषणा केल्यामुळे शिर्डी देवस्थानने हा निर्णय घेतल्याचं देवस्थानकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
राज्यात मुंबई,पुणे,नागपूर,अमरावती आणि ठाणे या प्रमुख पाच जिल्ह्यांत कोरोनाचे नवे रुग्ण आढळण्याचे प्रमाण ६५ टक्के आहे. महाराष्ट्रात दररोज रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. यामुळे सर्वत्र नियमांमध्ये बदल करण्यात येत आहेत.
कोरोनाची दुसरी लाट आली असून या पार्श्वभूमीवर देशाच्या इतर भागात देखील बाधितांचा आकडा वर जाऊ लागला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर इतर देशांमध्ये सापडलेला कोरोनाचा नवा स्ट्रेनदेखील भारतात काही राज्यांमध्ये सापडला आहे.
वाचा: सुन ले दिल्ली! ४० लाख ट्रॅक्टरसह शेतकरी संसदेला घेराव घालणार; टिकैत यांचा इशारा
हे बाधित लागलीच शोधून त्यांना क्वारंटाईन केले असले, तरी देशातले इतर कोरोनाबाधित वाढू लागले आहेत. महाराष्ट्रात देखील हेच चित्र असल्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा निर्बंध लागू करण्यात आले असून अहमदनगरमधील नाईट कर्फ्यू हा त्याचाच एक भाग आहे.
दर्शनाच्या वेळेसोबत इतरही निर्बंध भाविकांसाठी नव्याने लावण्यात आले
यावेळी शिर्डी संस्थानने दर्शनाच्या वेळेसोबत इतरही काही निर्बंध भाविकांसाठी नव्याने घातले आहेत. त्यामध्ये सकाळची काकड आरती आणि रात्रीची शेज आरती भक्तांसाठी बंद असेल, गुरुवारची पालखी देखील बंद असेल, गुरुवार-शनिवार-रविवार आणि उत्सवाच्या दिवशी बायोमेट्रिक पास काऊंटर बंद ठेवण्यात येईल, अशा काही नियमांचा समावेश आहे.
































































































































