मुंबई : अभिनेत्री कंगना रणौतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. आता कंगनाची मुख्य भूमिका असलेला एक चित्रपट करण्यास सिनेमॅटोग्राफर पीसी श्रीराम यांनी नकार दिला आहे. पीसी श्रीराम यांनी ट्विट करत याविषयी माहिती दिली आहे.
“एका चित्रपटात कंगना रणौतची मुख्य भूमिका असल्यामुळे तो चित्रपट करण्यास मी नकार दिला आहे. हा चित्रपट करत असताना मला मनातल्या मनात फार अस्वस्थता वाटत होती. त्यामुळे माझं मत मी निर्मात्यांना सांगितलं आहे आणि त्यांनीदेखील माझ्या मताचा आदर केला आहे.जेव्हा एखादी गोष्ट योग्य आहे असं तुम्हाला वाटतं तेव्हाच असं काहीसं घडतं”, असं पीसी श्रीराम म्हणाले.
दरम्यान, पीसी श्रीराम यांनी कंगनाची मुख्य भूमिका असलेल्या चित्रपटाच्या नावाचा उल्लेख केला नाही. मात्र त्यांच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधाण आलं आहे. यात अनेकांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. तर काहींनी त्यांच्यावर टीका केली आहे.







































































































































