मुंबई : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नागपुर मधील पहिल्याच कार्यक्रमाने भारतीय जनता पक्ष व देवेंद्र फडणवीसांची पळता भुई थोडी झाली असून घाबरलेल्या फडणवीसांचे ताळतंत्र सुटल्याने ते राहुल गांधींवर खोटे नाटे आरोप करून बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. हिंदु धर्मात लाल रंग शुभ मानला जातो पण भाजपाला तो ही अपवित्र वाटू लागला आहे. संविधानाच्या पुस्तकाचा रंग लाल, पिवळा का काळा असावा हे ठरविण्याचा अधिकार संविधान विरोधी लोकांना नाही. संविधान वाचवणे भाजपा व फडणविसांना शहरी नक्षलवाद वाटतो का? भारत जोडो यात्रेत राहुल गांधीसोपबत चालणारी मराठी माणसे शहरी नक्षलवादी आहेत का असा सवाल विचारून देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) भारत जोडो यात्रेत सहभागी झालेल्या महाराष्ट्रातील सर्व नागरिकांची माफी मागावी असा घणाघाती हल्ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समाचार घेताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, राहुल गांधी संविधान ‘बचाओ’ची भूमिका हाती घेत संविधानाचे पुस्तक दाखवत असतात. ज्या लोकांनी आरक्षण व संविधानाला विरोध केला, संविधान जाळले त्या व्यवस्थेच्या बाजूला भाजपाच्या शक्तीस्थळाजवळच सुरेश भट्ट सभागृहात राहुल गांधींचा संविधान संमेलन कार्यक्रम झाला, त्यामुळे भाजपाचा जळफळाट झाला आहे. भाजपाला डाव्या विचारसरणीचे लोक देशाचे विरोधक वाटत असतील तर केरळमध्ये डाव्या पक्षाचे सरकार आहे, पश्चिम बंगालमध्ये अनेक वर्षे डाव्या पक्षांचे सरकार होते, देशात आजही डाव्या पक्षाचे आमदार, खासदार आहेत, त्यांना मतदान करणारे देशविरोधी आहेत का? आणि भाजपाला तसे वाटत असेल तर केंद्रात त्यांची सत्ता आहे फडणविसांनी कारवाई करावी. कोणालाही देशभक्तीचे किंवा देश विरोधाचे सर्टिफिकेट देण्याचा अधिकार भाजपाला कोणी दिला.
भाजपाची सर्वात मोठी अडचण राहुल गांधी हे आहेत, भाजपा राहुल गांधी यांना घाबरतात म्हणून मनुवादी विचारसरणीचे हे लोक त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत पण राज्यातील जनता सुज्ञ आहे भाजपाला ते त्यांची जागा दाखवतील, असेही नाना पटोले म्हणाले.
—




































































































































