मुंबई : राज्याचे अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांचे दाऊद इब्राहिमशी (Dawood Ibrahim) संबंध जोडून, त्यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या भाजपला काँग्रेसने खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला आहे. बॉम्बस्फोटातील आरोपी इक्बाल मिर्ची याच्याशी संबंधित कंपन्यांकडून मिळालेल्या देणग्या भाजपला कशा चालतात, असा सवाल पक्षाचे प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी केला.
राज्याचे मंत्री नवाब मलिक यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केली आहे, त्यांच्या राजीनाम्याची मागणी करीत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली.
त्यासंदर्भात बोलताना प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी इक्बाल मिर्ची या अतिरेक्याशी संबंधित कंपन्यांकडून भाजपला मिळालेल्या देणग्यांबाबत फडणवीस काही बोलणार आहेत का, असा सवाल केला आहे. लोंढे यांच्या या वक्तव्यावरून पुन्हा राजकारण पेटण्याची शक्यता आहे.








































































































































