जळगाव : मी मुख्यमंत्रिपदाचा दावेदार असल्यामुळे माझ्यावर अन्याय झाला आहे. माझ्यावर खोटे आरोप करणाऱ्या हॅकर मनिष भंगाळेची त्याचवेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी रात्री दीड वाजता भेट घेतली होती. त्यावेळी त्यांच्यासोबत कृपा शंकर सिंह होते. त्याचे फोटो माझ्याकडे आहेत. यांनी कशासाठी भेट दिली? असा सवाल भाजपचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला आहे.
मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार असे म्हणत विधानसभा निवडणुकीत ज्येष्ठ नेत्यांच्या तिकिटांची काटछाट केल्यामुळेच भाजपाचे सरकार येवू शकले नाही, असा हल्लाबोल खडसेंनी केला. आपल्यावर झालेल्या या अन्यायाबाबत ‘नानासाहेब फडणवीसांचे बारभाई कारस्थान’ नावाचे पुस्तक लिहिणार असल्याचेही खडसे यांनी सांगितले.
अजित पवार यांच्यासोबत दोन-तीन दिवस संसार केला
मुक्ताईनगर येथील आपल्या निवासस्थानी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना पत्रकारांनी त्यांना देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्यावर टीका का करत नाहीत? असा प्रश्न विचारला. या प्रश्नाच खडसे यांनी मिश्कील उत्तर दिले. आपली सर्व सत्वे तत्वे विसरुन अजित पवार यांच्यासोबत दोन-तीन दिवस संसार केला आहे. मुहर्तसाधून लग्नं केलं. शपथ घेतली. मुख्यमंत्री झालो उप मुख्यमंत्री झालो. आता तीन चार दिवस दुसऱ्याच्या घरात राहिल्यावर आम्ही कशी टीका करणार, असे खडसे म्हणाले.
माझ्याकडे त्या व्हिडियो क्लिप
माझ्यावर आरोपांचे हे षडयंत्र होते. हे षडयंत्र कुणी केले? कसे केले? त्यात कोण होते? कोणत्या मंत्र्याचे पीए होते? कोण अंजली दमानिया यांना भेटत होते, याच्या व्हिडिओ क्लिप देखील माझ्याकडे आहेत. मी हे पुरावे वरिष्ठांना देखील दाखवणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.