
पुणे/मुंबई: राज्यात जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका निवडणुका होत आहेत. या निवडणुका अत्यंत महत्वाच्या असून काँग्रेसच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी विषयवार कामाची जबाबदारी घेतली पाहिजे. प्रभाग रचना, गट व गण तसेच मतदार याद्यांचा अभ्यास करा व काही हरकती असतील तर त्या नोंदवल्या पाहिजेत. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहण्याचा प्रयत्न करा त्यासाठी सोशल मीडिया हे प्रभावी अस्त्र आहे. ७१ टक्के लोक सोशल मीडियाचा वापर करतात, त्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहण्यासाठी सक्रीय रहा, असे आवाहन विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी केले आहे.
खडकवासला येथे पदाधिकारी प्रशिक्षण कार्यशाळेत बोलताना सतेज ऊर्फ बंटी पाटील पुढे म्हणाले की, आपल्या भागातील जनतेचे प्रश्न हाती घेऊन आंदोलने केली पाहिजेत. आठवड्यातून एक तरी आंदोलन झाले पाहिजे. १८ ते २५ वयोगटातील तरुण नवमतदार काँग्रेस सोबत जोडला गेला पाहिजे त्यासाठी त्यांच्यापर्यंत पोहचले पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी कामाला लागा, आगामी काळात महाराष्ट्र काँग्रेसमय झाला पाहिजे असा संकल्प करा व त्यादृष्टीने वाटचाल करा असे आवाहनही पाटील यांनी केले.
काँग्रेस कार्य समितीचे सदस्य व अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या प्रशिक्षण विभागाचे प्रमुख सचिन राव यांनी ‘सामाजिक न्याय व जनगणना’ या विषयावर मार्गदर्शन केले. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत विकास पोहचला पाहिजे यासाठी प्रत्येक समाज घटकाची संख्या निश्चित झाली पाहिजे. राहुल गांधी यांनी यासाठी आग्रही भूमिका घेत जातनिहाय जनगणना करण्याची मागणी लावून धरली. सरकारलाही अखेर झुकावे लागले व जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घ्यावा लागला. ज्या समाज घटकाची जेवढी लोकसंख्या तेवढा त्यांचा हिस्सा असला पाहिजे. जातनिहाय जनगणनेसाठी राहुल गांधींनी घेतलेल्या भूमिकावर जनजागृती करा, असेही सचिन राव म्हणाले.
‘सांस्कृतिक राजकारण’ या विषयावर शाहीर संभाजी भगत यांनी मार्गदर्शन केले, देशात आज सर्व क्षेत्राचे धार्मिकीकरण केले आहे. सण, उत्सवाचेही व्यावसायीकरण व धार्मिकीकरण केले आहे. सण व उत्सव हे हत्यार बनवले आहेत, याची सुरुवात घर व शाळेतूनच होते. आज जे लोक सत्तेवर आहेत ते कदाचित सत्तेवरून जातीलही पण सांस्कृतीक सत्तेवरून ते जाणार नाहीत. समाजात विष पेरण्याचे काम सुरु असून हे चित्र बदलले पाहिजे. काँग्रेसच्या हाती सत्ता येईल पण जमीन हातात घ्यावी लागणार आहे आणि विष पेरलेली ही जमीन कसावी लागणार आहे, असे संभाजी भगत म्हणाले.
ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांनी ‘सामाजिक राजकीय आव्हाने’ या विषयावर मार्गदर्शन केले, निवडणूक जिंकण्यासाठी सामाजिक द्वेष पसरवण्याचा प्रकार सुरु आहे. कोपर्डीची घटना, परभणीतील सोमनाथ सुर्यवंशीचा पोलीस कोठडीतील मृत्यू, बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख यांची क्रूर हत्या आणि पुण्यात तीन मुलींना पोलिसांनी केलेली जातीवाचक शिवीगाळ व मारहाणीची घटना याची त्यांनी उदाहरणे दिली. पुण्यातील या घटनेवेळी १७-१८ तास ठिय्या देऊनही पोलीसांनी एसटीएसटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यास नकार दिला. अशा प्रसंगी त्यांच्या पाठीशी काँग्रेसने खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. हिंदू मुस्लीम वाद जाणीवपूर्वक निर्माण केला जात असून त्यांना नागरिकत्व सिद्ध करायला लावले जात आहे. आधी मतदार सरकार ठरवत होते आता SIR आणून सरकार मतदार ठरवू लागले आहे. महाराष्ट्र सरकारने जनसुरक्षा विधेयक आणले असून अर्बन नक्षलवाद नावाचा बागुलबुवा उभा केला आहे. न्याय व्यवस्थेतही सर्वकाही आलबेल नाही. न्यायाधीशच विचित्र टिपण्णी करु लागले आहेत हे सर्व भयंकर आहे. अदानी अंबानीसाठी आजचे सत्ताधारी देशालाच देशोधडीला लावत आहेत, असे टकले म्हणाले..
निवृत्त प्रशासकीय अधिकारी महेश झगडे यांनी ‘प्रशासन व कार्यकर्ता’ या विषयावर मार्गदर्शन केले, लोकशाहीत शासन व प्रशासन ही रथाची दोन चाके आहेत असे गोंडस नाव दिले आहे पण ते खरे नाही. खरे तर प्रशासनच सरकार असल्यासारखे वागत आहे. प्रशासन ही व्यवस्था सरकार चालवण्यासाठी सहकार्य करणारी व्यवस्था आहे. प्रशासक बटीक वा गुलाम असता कामा नये तर ती स्वतंत्र बाण्याची असली पाहिजे. या प्रशासनाला भक्कम कवच कुंडले आहेत त्यामुळे त्यांना काढून टाकणे खूप कठीण आहे. राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याला प्रशासनाबद्दल माहिती असणे गरजे आहे, असेही झगडे म्हणाले
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या कार्यशाळेचा उद्या दिनांक १२ ऑगस्ट ला समारोपाची दिवस आहे. प्रभारी रमेश चेन्नीथला, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया विभागाचे प्रमुख पवन खेरा, इतिहासकार अशोककुमार पांडेय व ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे हे मार्गदर्शन करतील.