मुंबई : सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात अभिनेत्री कंगना रनोट सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करताना दिसत आहेत. नुकतेच तिने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मिरशी केली आहे. यानंतर तिच्यावर टीकेची झोड उठली आहे. मराठी कलाकारांसोबतच बॉलिवूड सेलेब्रिटींनीही तिच्यावर निशाणा साधला आहे. आता मनसेने तिला धमकीवजा इशाराच दिला आहे.
मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी कंगनाच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, माझ्या मुंबई पोलिसांबद्दल ‘जजमेंटल’ होऊन कुणीही ‘पंगा’ घेऊ नये. याला धमकी समजा किंवा सल्ला. पण माझ्या मुंबई पोलिसांबद्दल काही बरळेललं मीच काय, कोणताही सच्चा मुंबईकर सहन करणार नाही असं म्हणत चांगलंच सुनावलं आहे.
खोपकरांनी ट्विटवर लिहिलं…
‘माझ्या मुंबई पोलिसांबद्दल ‘जजमेंटल’ होऊन कुणीही ‘पंगा’ घेऊ नये. मुंबईत आज आमच्या बहिणी मध्यरात्रीसुद्धा कामावरुन घरी बिनधास्तपणे जातात, याला कारण आहेत माझे मुंबई पोलीस. आज मुंबईत मी सुरक्षित आहे ते केवळ माझ्या मुंबई पोलिसांमुळे. कामाचा कितीही ताण असो, पगार अनियमित असो, मनुष्यबळ कमी असो, ऊन असो-पाऊस असो…कशीचीही पर्वा न करता हिंमतीने पाय रोवून उभे राहतात ते माझे मुंबई पोलीस. ज्या कुणाला माझ्या या मुंबई पोलिसांची भीती वाटते त्यांनी खुशाल आपापल्या राज्यात जाऊन असुरक्षित राहावं. याला धमकी समजा किंवा सल्ला. पण माझ्या मुंबई पोलिसांबद्दल काही बरळेललं मीच काय, कोणताही सच्चा मुंबईकर सहन करणार नाही’
कंगना म्हणाली होती
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपल्याला मुंबईत न येण्याची धमकी दिली असून मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी का वाटू लागली आहे अशी टीका कंगनाने ट्विटरवरुन केली होती. तिने ट्विट करत लिहिले होते की, ‘ आधी झळकलेले आझादीचे फलक आणि आता मिळत असलेल्या उघड धमक्या यामुळे मुंबई पाकिस्तानव्याप्त काश्मीरसारखी का वाटू लागली आहे?’,