मुंबई : काँग्रेसला अंतर्गत मतभेद संपवून पुढं जाण्याची गरज आहे. ‘गांधी कुटुंब हे काँग्रेसचे आधार कार्ड आहे. राहुल गांधी यांच्यात नेतृत्व करण्याची क्षमता आहे. ते काँग्रेसला उत्तम नेतृत्व देऊ शकतात,’ असं शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ( Rahul Gandhi can give good leadership to Congress says Sanjay Raut) ते मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते.
‘काँग्रेसचे नेतृत्व गांधी कुटुंबाबाहेरील कोणी करावे अशी मागणी होत असेल तर ती सध्याच्या परिस्थितीत तितकीशी संयुक्तिक वाटत नाही. काँग्रेस पुढे घेऊन जाऊ शकेल असं गांधी कुटुंबाबाहेर सध्या कुणी दिसत नाही. राहुल गांधी यांच्यात नेतृत्वाची क्षमता आहे. त्यांच्या नेतृत्वामुळंच राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगडमध्ये काँग्रेसला सत्ता मिळाली,’ असा दावाही राऊत यांनी केला.
खरंतर काँग्रेस हा आजही देशातील प्रमुख विरोधी पक्ष आहे. मात्र, त्याची ताकद क्षीण झाली आहे. पक्षात विस्कळीतपणा आला आहे. त्यातून सावरण्याची गरज आहे. काँग्रेस हा गावागावात कार्यकर्ते असलेला, उत्तर, पश्चिम भारतापासून ईशान्येपर्यंत पसरलेला पक्ष आहे.काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीतील मतभेद हा त्यांचा अंतर्गत मुद्दा आहे असं राऊत म्हणाले.