
मुंबई: मागील १२ वर्षापासून ‘चौकीदार ही चोर है’ अशी पार्श्वभूमी आपल्या देशाला लाभली असून नरेंद्र मोदी पंतप्रधान (Pm Narendra Modi) झाल्यापासून शेतकरी संकटात सापडलेला आहे. शेतमालाला भाव नाही, शेती करणे महाग झाले आहे, शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत, बेरोजगारी वाढलेली आहे पण पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र शेतकरी, महिला अत्याचार, बेरोजगारी, महागाई यावर गप्प आहेत. अमेरिकेसमोर नरेंद्र मोदी सरेंडर झाल्याने आता आपला शेतकरी व शेती दोन्हीसमोर मोठी समस्या उभी ठाकली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या भाजपा सरकारला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय शेतकरी गप्प बसणार नाही, असे प्रतिपादन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ Harshwardhan vasantrao sapkal यांनी केले आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर येथे शेतकरी मेळावा संपन्न झाला. यावेळी खासदार डॉ. कल्याण काळे, माजी मंत्री अनिल पटेल, छत्रपती संभाजीनगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, माजी आमदार नामदेवराव पवार, एनएसयुआयचे प्रदेशाध्यक्ष सागर साळुंखे, प्रवक्ते हनुमंत पवार यांच्यासह काँग्रेस नेते व पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, नरेंद्र मोदी सरकारला जनतेचे काहीही पडलेले नाही, ते फक्त मोजक्या उद्योगपतींचे हित जपण्यातच मग्न आहेत. ‘हम दो, हमारे दो‘ या धोरणातून भाजपाचे सरकार अदानी आणि अंबानी या मोजक्या उद्योगपतींसाठीच काम करत असल्याचे चित्र देशात आहे. स्मार्ट मीटर लावून जनतेला लुटले जात आहे आणि या स्मार्ट मीटरचा पैसा अदानी व भाजपाच्या खिशात जात आहे. समृद्धी महामार्ग, मिसिंग लिंक सह सर्व कामात पैसे खाल्ले, आता तर यांनी प्रभू रामाच्या मंदिरातील पैसेही खाल्ले. सिंधी समाजाने २०० चांदीच्या विटा दिल्या त्याचा हिशोब नाही, भक्तांनी कोट्यवधी रुपयांचे दान दिले त्याचा हिशोब नाही. अयोध्येतील राम मंदिरासाठी जमलेले १४०० कोटी रुपयेही गायब केले आहेत. देशाचा कारभार माजी सरसंघचालक गोलवलकर यांच्या बंच ऑफ थॉट पुस्तकानुसार चालवला जात आहे.
देशात आज ‘पैसा फेक, तमाशा देख‘ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून सत्ताधारी केवळ सत्तेचा आणि पैशाचा खेळ खेळत आहेत. भ्रष्टाचार, महागाई आणि शेतकरीविरोधी धोरणांविरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरून संघर्ष करेल. जनतेच्या प्रश्नांसाठी लढणे हीच काँग्रेसची भूमिका आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.










































































































































