मुंबई : सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर राज्य सरकारला मोठा धक्का बसला आहे. राज्य सरकारकडून निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त करण्यात आलेली असून विरोधकांनीही सरकारवर जोरदार टीका आहे. राज्य सरकारमध्ये समन्वयाचा अभाव असल्याची टीका विरोधक करत आहे. दरम्यान याचिकाकर्ते गुणरत्न सदावर्ते यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत केलं असून हत्या झाली तरी खुल्या गुणवंतांसाठीची लढाई सुरु राहील असं म्हटलं आहे. ते एबीपी माझाशी बोलत होते.
“सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं मी स्वागत करतो. महाराष्ट्रातील खुल्या वर्गातील गुणवंत जे भीतीपोटी समोर येऊ शकत नव्हते त्यांनी ज्याप्रकारे मला आणि कुटुंबाला समर्थन दिलं, माझ्यासोबत उभे राहिले त्यांना मी शुभेच्छा देतो,” असं ते म्हणाले आहेत.
“मराठा आरक्षण, ५२ मोर्चे, बीएमडब्ल्यूमधून जमवलेले लाखो लोक…
“मराठा आरक्षण, ५२ मोर्चे, बीएमडब्ल्यूमधून जमवलेले लाखो लोक, शरद पवारांच्या दिल्लीतील बैठका, संजय राऊतांची एंट्री, देवेंद्र फडणवीस यांना वेठीस धरणे, उद्धव ठाकरे यांच्यावर दबाव आणणे याविरोधात खुल्या गुणवंतांची आणि संविधानची ही लढाई होती,” असंही त्यांनी म्हटलं आहे. “सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला अल्ट्रा व्हायरस जाहीर केलं आहे. करोना व्हायरस असतो त्याप्रमाणे,” असंही यावेळी त्यांनी सांगितलं.
आरक्षणाच्या चष्म्यातील गलिच्छ राजकारण देशात आणि राज्यात होऊ नये…
“आरक्षणाच्या चष्म्यातील गलिच्छ राजकारण देशात आणि राज्यात होऊ नये आणि आम्ही होऊ देणार नाही. आमचा खून जरी झाला तरी खुल्या गुणवंतांसाठीची लढाई सुरु राहील. सुप्रिया सुळे, शरद पवार, मराठा संघटना, विश्वास नांगरे पाटील, मराठा पोलीस कर्मचारी, अधिकारी जे कोणी एकत्रित येऊन आमचा जीव घेण्याचा प्रयत्न करतील त्यांना आमच्या मृत्यूनंतरही देश, राज्य जाब विचारेल,” असं ते म्हणाले आहेत.
महागडे पेहराव, बीएमडब्ल्यू गाड्यांमध्ये लोक जमलेले अशा प्रकारचा मोर्चा अपेक्षित नाही…
“महागडे पेहराव, बीएमडब्ल्यू गाड्यांमध्ये लोक जमलेले अशा प्रकारचा मोर्चा अपेक्षित नाही. समाजातून दूर राहिलेले अशी मराठ्यांची परिस्थिती नाही. दडपशाही चालणार नाही, ही राजेशाही नाही. ही पाटीलकी, देशमुखी नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधानप्रमाणे चालणारा देश आहे. आज संविधानाचा, सामान्याचा विजय झाला आहे. या विजयाला कोणीही डिवचण्याचा प्रयत्न करु नये,” असा इशारा यावेळी त्यांनी दिला.
कोणालाही आऱक्षण नको असून फक्त दबावापोटी होकार देत असल्याचं सांगत त्यांनी उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, शरद पवारांवर निशाणा साधला. तसंच अशोक चव्हाणांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे.



















































































































































































