नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधींना (Rahul Gandhi) पंतप्रधान नरेंद्र (PM Narendra Modi) मानहानीप्रकरणी गुजरातच्या सुरतमधील जिल्हा न्यायालयानं दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. गुरुवारी (२३ मार्च) राहुल गांधींना दोषी ठरवत ही शिक्षा सुनावली गेली. त्यानंतर आज(शुक्रवार, २४ मार्च) लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधींची खासदारकी रद्द करत असल्याचा निर्णय जाहीर केला. राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यानंतर देशातली राजकीय वातावरण तापलं आहे.
राहुल गांधींची खासदारकी रद्द केल्यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या. आता बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने याबाबत ट्वीट केलं आहे. राहुल गांधींची खासदारकी रद्द केल्याचं एएनआयचं ट्वीट स्वराने तिच्या अकाऊंटवरुन रिट्वीट केलं आहे. “पप्पूला किती घाबरतात, हे यावरुन सिद्ध झालं आहे. कायद्याचा गैरवापर करुन राहुल गांधींची वाढती प्रसिद्धी, विश्वासाहर्ता व त्यांच्या उंचीवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी हे सगळे डावपेच केले जात आहेत, हे स्पष्ट झालं आहे. राहुल गांधी ही निवडणूक लढवू शकणार नाहीत. पण ते यातून नक्कीच बाहेर पडतील”, असं स्वराने ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
That’s how scared they are of so-called ‘Pappu’ ! Blatant misuse of law to ensure that @RahulGandhi ‘s growing popularity, credibility & stature are curbed and clear strong-arm tactics for 2024 Lok Sabha that RG now cannot contest.. My guess is RG will come out of this taller ✊🏽 https://t.co/GEsLrgQuOC
— Swara Bhasker (@ReallySwara) March 24, 2023
नेमकं प्रकरण काय?
२०१९ लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत एक वक्तव्य केलं होतं. कर्नाटकातील एक सभेत “नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी यांच्या आडनावांमध्ये समान धागा काय आहे? सगळ्या चोरांचं आडनाव मोदी का?” असं राहुल गांधी म्हणाले होते. यासंदर्भात गुजरातच्या सुरतमधील जिल्हा न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता.
राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींचा अपमान केल्याचा दावा करण्यात आला होता. याप्रकरणी गुरुवारी(२३ मार्च) न्यायालयाने राहुल गांधींना दोषी सिद्ध करून दोन वर्षांची शिक्षा सुनावली. राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावली गेल्यामुळे त्यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी घेतला.