मुंबई : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यात मध्यावधी निवडणुका होतील अशी परिस्थिती असल्याचा दावा केला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना राजभवनात जाऊन सांगावं लागेल असा टोला लगावला आहे. (sanjay-raut-on-bjp-chandrakant-patil-claim-of-mid-election-in-maharashtra)
संजय राऊत यांनी फडणवीस भेटीवर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, “राजकीय चर्चा करणं गुन्हा आहे का ? जर दोन राजकीय नेते भेटत असतील तर देशाबद्दल, कृषी विधेयकं, जम्मू काश्मीर. चीन, पाकिस्तान, कोविडबद्दल चर्चा होते”.
महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुकांसारखी परिस्थिती – चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्रात सध्या मध्यावधी निवडणुकांसारखी परिस्थिती आहे असं वक्तव्य मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना केलं. महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष यांचं जे सरकार आहे त्या सरकारमध्ये समन्वय नाही. त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे असं त्यांनी म्हटलं आहे.
“पैसे किंवा खर्च हा एकमेव मुद्दा नसतो तर खूप वेळ जातो, अनिश्चतता असते. आज निवडून आलेले आमदार उद्या असतील की नाही ते ठाऊक नसतं. त्यामुळे मध्यावधी निवडणुका कुणालाच नको आहेत. पण अस्थिरतेमधून मार्ग कसा काढायचा हे पण लक्षात येत नाही. मध्यावधी निवडणूक होऊ नये म्हणून सगळेच प्रयत्न करतील. पण शेवटी कुणाचीच कॉम्बिनेशन जुळली नाहीत, तर काहीही पर्याय उरणार नाही,” असं त्यांनी म्हटलं आहे.
‘दोन वेगवेगळ्या पक्षांचे मोठे नेते एकमेकांना भेटत असतील, दोन-अडीच तास बोलत असतील तर ते चहा-बिस्किटावर नक्कीच बोलणार नाहीत. त्यात राजकीय चर्चा होणारच,’ असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. पाटील यांच्या या वक्तव्यामुळं फडणवीस-राऊत भेटीचे गूढ आणखी वाढलं आहे.
दोन दिवसांपूर्वी शिवसेनेचे खासदार संजय राऊत व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मुंबईतील एका हॉटेलात भेटले. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे दोन तास चर्चा झाली. सध्या एकमेकांचे कट्टर राजकीय वैरी असलेल्या पक्षाच्या नेत्यांच्या भेटीमुळं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. या भेटीबद्दल वेगवेगळे तर्क मांडले जात आहेत. ही भेट राजकीय नव्हती. ‘सामना’साठी घ्यावयाच्या मुलाखतीबाबत होती, असा खुलासा राऊत यांनी केला आहे, तर फडणवीसांनी यातून राजकीय अर्थ काढण्याची गरज नसल्याचं म्हटलं आहे. असं असलं तरी या भेटीची चर्चा थांबण्यास तयार नाही. त्यातच सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळं पुन्हा एकदा चर्चेला जोर आला आहे.
मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते. संजय राऊत व फडणवीसांच्या भेटीत राजकीय विषय निश्चितच होते. पण त्यातून कुठलाही निष्कर्ष निघालेला नाही,’ असं पाटील यांनी सांगितलं. राज्यात वेगळी राजकीय समीकरणं जुळण्याची शक्यताही त्यांनी बोलून दाखवली. ‘करोनामुळं सध्या संकटाची परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत कुणालाही निवडणुका नको आहेत. त्यावर अन्य पर्यायही समोर येऊ शकतो,’ असं सूचक वक्तव्यही त्यांनी केलं. यापुढं भाजप राज्यातील सर्व निवडणुका स्वबळावर लढेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.