नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी भारतात १०० कोटी डोसचं लसीकरण दिल्यानिमित्ताने देशाला संबोधित करत हे मोठ लक्ष्य प्राप्त केल्याचं सांगितलं. मात्र, काँग्रेससह विरोधकांनी मोदींवर यावरून सडकून टीका केलीय. काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी एक कार्टून शेअर करत ट्वीट केलंय. यात त्यांनी १०० कोटीनंतरची आठवण असं म्हणत सामान्य नागरिक साथीचा रोग, गॅस सिलिंडर दरवाढ, पेट्रोल-डिझेल दरवाढ याच्याखाली दबलेला असल्याचं कार्टून शेअर केलं. या कार्टूनमध्ये सामान्य नागरिक महागाईच्या बोजाखाली दबलेला असतानाही मोदी दगडावर झोपून विनाचिंता योगासनं करत असल्याचं दाखवलं आहे.
कर्नाटक काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धारमय्या यांनी ट्वीटची मालिकाच शेअर केलीय. यात त्यांनी म्हटलं, “100 कोटी (१ बिलियन) हा आकडा केवळ ऐकायला भारी वाटतो, मात्र यातील खरी मेख त्याच्या तपशिलात आहे. १३९ कोटी नागरिकांपैकी केवळ २९ कोटी नागरिकांनाच पूर्ण लसीकरण मिळालंय. म्हणजे केवळ २१ टक्के नागरिकांचं पूर्ण लसीकरण झालंय. मग भाजपाचे नेते नेमका कशाचा आनंद साजरा करत आहेत?”
The day after 1 billion….A reminder! pic.twitter.com/Co2Nmx7JIP
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) October 22, 2021
“उत्सव करणं थांबवा आणि प्रत्येकाला लस मिळेल यावर लक्ष केंद्रित करा”
“अमेरिकेत ५६ टक्के, चीनमध्ये ७० टक्के आणि कॅनडात ७१ टक्के नागरिकांचं संपूर्ण लसीकरण झालंय, मात्र भारतात केवळ २१ टक्के नागरिकांचं संपूर्ण लसीकरण झालंय. मोदींनी उत्सव साजरा करण्याआधी कामगिरी सुधारायला हवी. भविष्यात बुस्टर डोसची देखील गरज पडणार आहे. पहिला आणि दुसरा डोस शिल्लक असताना हे शक्य होणार आहे का? त्यामुळे हा उत्सव साजरा करणं थांबवावं आणि प्रत्येकाला लस मिळेल यावर लक्ष केंद्रित करावं,” असं मत सिद्धरमय्या यांनी आपल्या ट्वीटमध्ये व्यक्त केलं.
“६२ कोटी नागरिकांना लसीचा एकही डोस मिळालेला नाही”
“भाजपाचे नेते केवळ २१ टक्के जनतेचं लसीकरण झाल्याचा आनंद साजरा करत आहे का? केवळ २९ कोटी नागरिकांना कोरोना विरोधी लसीचे दोन डेस मिळाले आहेत आणि ४२ कोटी नागरिकांना लसीचा पहिला डोस मिळाला आहे. ६२ कोटी नागरिकांना लसीचा एकही डोस मिळालेला नाही. ३१ डिसेंबरपर्यंत देशातील सर्व नागरिकांचं संपूर्ण लसीकरणाचं ध्ये गाठण्यासाठी आणखी १०६ कोटी लसीचे डोस लागणार आहेत. करण्यासाठी,” असंही सिद्धारमय्या यांनी नमूद केलं.
“अपयशाची जबाबदारी घेताना गायब, श्रेय घेण्यासाठी कायम पुढे”
काँग्रेस नेते मनिष तिवारी यांनी देखील मोदी सरकारवर निशाणा साधला. पंतप्रधान कार्यालयाची एक खास कार्यपद्धती आहे. करोना काळात गुन्हेगारी स्वरुपाचा निष्काळजीपणा आणि दुर्लक्ष झालं त्याची जबाबदारी घेण्याची वेळ येते तेव्हा मोदी सरकार गायब असतं. मात्र, जेव्हा श्रेय घेण्याची वेळ येते तेव्हा सरकार सर्वात पुढे असतं.”
भारताने जानेवारी २०२० मध्ये लसीकरण मोहीम राबवण्यास सुरुवात केली. त्यानंतर गुरुवारी (२१ ऑक्टोबर २०२१) रोजी भारताने १०० कोटी डोस देण्याचा टप्पा पार केलाय.