‘लवकर लस येऊ दे, अवघं जग कोरोनामुक्त होऊ दे’; अजित पवार यांचं विठुराया चरणी साकडं

आज कार्तिक एकादशी,पुढील वर्षी आषाढी आणि कार्तिकी वारी परंपरेनुसारच

pandharpur-deputy-chief-minister-ajit-pawar-pays-homage-to-vitthal-rukmini
pandharpur-deputy-chief-minister-ajit-pawar-pays-homage-to-vitthal-rukmini

पंढरपूर l ‘लवकर लस येऊ दे, अवघं जग कोरोनामुक्त होऊ दे’ पंढरीच्या विठुराया चरणी वंदन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांनी कोरोनावर मात करण्यासाठी असं साकडं घातलं. आज कार्तिक एकादशीनिमित्त Kartiki Ekadashi उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी विठ्ठलाची Vitthal-Rukmini शासकीय महापूजा केली. यावेळी मानाचे वारकरी ठरलेले कवडु भोयर आणि त्यांच्या पत्नी कुसुमबाई भोयरही उपस्थित होते.

त्यानंतर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं पवार दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला. सत्कारावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, सारिका भरणे, अजितदादांचे पुत्र पार्थ आणि जय पवार यांची उपस्थिती होती.

खबरदारी घेणं गरजेचं

पंढरीच्या विठुराया चरणी वंदन करताना अजित पवार यांनी कोरोनावर मात करण्यासाठी लवकर लस येऊ दे आणि अवघं जग कोरोनामुक्त होऊ दे, असं साकडं घातलं. ‘अवघ्या जगासमोर कोरोनाचं संकट आहे. आपण या संकटाला सामोरं जात आहोत. मधल्या काही काळात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याचं पाहायला मिळत होतं. पण पुन्हा एकदा कोरोना रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे आपल्याला पुन्हा एकदा काही बंधनं पाळणं, खबरदारी घेणं गरजेचं आहे’, असं आवाहन अजित पवार यांनी जनतेला केलं.

आषाढी वारीप्रमाणे कार्तिकी वारीलाही सरकारनं केलेल्या आवाहनाला प्रतिसाद दिल्याबद्दल अजितदादांनी वारकरी संप्रदायाचे आभार मानले. यंदा राज्यातील जनतेच्या वतीनं आपल्याला विठ्ठलाची पूजा करण्याचं भाग्य लाभलं. पुढील वर्षी आषाढी आणि कार्तिकी वारी परंपरेनुसारच होईल, असा विश्वासही अजितदादांनी यावेळी व्यक्त केला.

‘शेतकऱ्यांचं दु:ख हलकं करण्याची ताकद दे’

कोरोना संकटापासून दूर करण्यासोबतच अजितदादांनी विठ्ठलाला अजून एक साकडं घातलं आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या जीवनातील दु:ख हलकं करण्याची ताकद सरकारला दे, असं मागणंही अजित पवार यांनी घातलं. कोरोनाला आळा घालायचा असेल तर सर्वकाही पांडुरंगावर सोडून चालणार नाही. सरकारने घालून दिलेले सर्व नियम लोकांनी काटेकोरपणे पाळावे असं आवाहनही पवार यांनी केलं.

संविधान दिनाच्या शुभेच्छा

सीमेवर शत्रुशी लढताना वीरमरण आलेल्या जवानां अजित पवार यांनी श्रद्धांजली अर्पण केली. तसंच संविधान दिनानिमित्त राज्यातील जनतेला त्यांनी शुभेच्छाही दिल्या. त्यानंतर अजित पवार यांच्याहस्ते मानाचे वारकरी ठरलेले कवडु भोयर आणि त्यांच्या पत्नी कुसुमबाई भोयर यांना राज्य परिवहन महामंडळाच्या वतीनं दिला जाणारा प्रवास सवलत पास दिला. तसंच विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या दैनंदिनी – 2021 चं प्रकाशनही अजितदादांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी जिल्ह्यातील अधिकारी, मंदिर समितीचे पदाधिकारी आणि समाजातील काही प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here