‘या’ फौजांचा वापर उद्या देशावरच उलटू शकतो, संजय राऊतांचा अमित शाहांना इशारा

मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी बदनामी कटाची मोहीम उधळून लावली

Sanjay Raut's warning to Amit Shah
Sanjay Raut's warning to Amit Shah

सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरून काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी सोशल मीडियावरील फेक अकाऊंटसबद्दल गौप्यस्फोट केला होता. मुंबई पोलिसांची बदनामी करण्यासाठी हे अकाऊंट तयार करण्यात आले होते. या प्रकरणावरून खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना राजकारणात विरोधकांचे चारित्र्यहनन आणि विरोध करणाऱ्यांना खच्ची करण्यासाठी या फौजांचा वापर उद्या देशावरच उलटू शकतो, असा इशार देत सल्ला दिला आहे.

शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी आपल्या रोखठोक सदरातून फेक अकाऊंटसबद्दल भाष्य केलं आहे. राऊत यांनी देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पुढाकार घेण्याचं आवाहन केलं आहे. “अमित शहा आज देशाचे गृहमंत्री आहेत. सायबर फौजांचा बेकायदेशीर वापर देशाला, समाजाला घातक ठरू शकतो हे त्यांनी मान्य केले पाहिजे.

राजकारणात विरोधकांचे चारित्र्यहनन आणि विरोध करणाऱ्यांना खच्ची करण्यासाठी या फौजांचा वापर उद्या देशावरच उलटू शकतो. अमित शहा यांनीच एका कार्यक्रमात सांगितले होते, ”आम्ही कोणतीही बातमी आमच्या हजारो ‘व्हॉटस्ऍप’ ग्रुपच्या माध्यमांतून पटवून देऊ शकतो.” हा आत्मविश्वास एका राजकीय पक्षाचे नेते म्हणून ठीक आहे, पण आज देशाची सूत्रे आपल्या हाती आहेत हे त्यांना विसरता येणार नाही.

ज्या सोशल मीडियाने मनमोहन सिंग व राहुल गांधी यांना निकम्मे ठरवले, त्याच सोशल मीडियावर रिकाम्या बोगद्यात लष्करी गाडीवर उभे राहून आपले पंतप्रधान हात हलवत पुढे निघाले असल्याचा ‘व्हिडीओ’ व्हायरल झाला व पंतप्रधानांची प्रचंड खिल्ली उडवली गेली. हे बरोबर नाही.

वाचा l Rahul Gandhi l ‘देशातील अनेक लोक दलित, मुस्लिम, आदिवासींना माणूस समजत नाहीत’

राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री, सेनाप्रमुख, पोलीस यांना ‘टार्गेट’ करणे म्हणजे देशाच्या भवितव्याचा खड्डा खणण्यासारखे आहे. सुशांतप्रकरणी एकट्या मुंबई पोलिसांना बदनाम करण्यासाठी 80 हजार फेक अकाऊंटस् निर्माण केली जातात. म्हणजे अशा प्रकारची किमान पाच कोटी फेक अकाऊंटस् सोशल मीडियावर सक्रिय आहेत.

हे बेकायदेशीर काम कायद्यानेच थांबवायला हवे. देशाच्या गृहमंत्र्यांनी त्यात पुढाकार घ्यावा. सुरुवात स्वतःच्या पक्षापासून करावी लागेल,” असा सल्ला राऊत यांनी शाह यांना दिला आहे.

“फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सऍप ही आता नवी विद्यापीठे व लढण्याची रणांगणे झाली आहेत. हाथरस, सुशांत प्रकरणात ते स्पष्ट दिसले. कंगना या नटीने मुंबईस ‘पाकिस्तान’ म्हटले व त्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या तेव्हा माझ्या फोनवर घाणेरडे संदेश पाठविणारे बहुतेक नंबर परदेशातले होते. हे सर्व ठरवून झाले.

सुशांत प्रकरणातील ऐंशी हजार फेक अकाऊंटसपैकी ते नंबर असायला हरकत नाही. प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य आहे. सोशल मीडिया नव्हता तेव्हाही ते स्वातंत्र्य होते व त्या स्वातंत्र्यासाठी जे अनेक लढे झाले, त्यातला एक लढा आणीबाणी विरोधातला होता. तो वृत्तपत्रांनी जिंकला. राहुल गांधी, उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी यांच्या प्रतिमा मलिन करणे हे समाज माध्यमांवर सुरू असते, पण शेवटी सुशांत प्रकरणी सगळ्यांचं बिंग फुटले.

वाचा l Jaggery benefits l गुळाचे फायदे कोणते जाणून घ्या

ऐंशी हजारांच्या सायबर फौजांचे पानिपत झाले. कारण सत्य त्यांच्या बाजूने नव्हते. सुशांतने आत्महत्याच केली हे ‘एम्स’ने जाहीर केले व मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी बदनामी कटाची मोहीम उधळून लावली. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन!,” असं म्हणत राऊत यांनी भाष्य केलं आहे.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here