मुंबई: ‘दिल्लीत भाजपचा पराभव झाल्यानंतर तिथं दंगे उसळले होते. आता प. बंगालमध्येही तेच घडलं. देशात कोरोनामुळं आधीच मुडद्यांच्या राशी पडत असताना दंग्यांचं राजकारण करून देशाला बदनाम का केलं जातंय? ममता बॅनर्जी यांना अपशकून करण्यासाठीच बंगालात हिंसाचार घडवला जातोय का?,’ असा सवाल करत शिवसेनेनं थेट भाजपवर निशाणा साधला आहे.shiv-sena-blames-bjp-for-violence-in-west-bengal-news-update
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर पुन्हा एकदा हिंसाचार उफाळून आला आहे. यामागे सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचा हात असल्याचा भाजपचा दावा आहे. आंदोलनं करून, पत्रकं काढून भाजप तृणमूल काँग्रेसला दोष देत आहे. हायकोर्टात जाऊन राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी केली जात आहे. शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखातून या घडामोडींवर भाष्य करत भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.
‘प. बंगालमध्ये केवळ भाजपच्या लोकांवर हल्ले होत असल्याचा दावा चुकीचा आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हल्ले सुरू आहेत. दोन्हीकडील कार्यकर्ते मारले गेले आहेत. मात्र, भाजपचे प्रचारतंत्र जोमात असल्यामुळं देशात वेगळं चित्र जात आहे.
आजच्या हिंसाचाराचे मूळ भाजप नेत्यांच्या निवडणुकीतील चिथावणीखोर वक्तव्यात आहे. बंगालातील भाजप नेत्यांनी प्रचारात ताळतंत्र सोडलं होतं. हिंसेचं खुलं समर्थन हे लोक करीत होते. हिंसा करा, खूनखराबा करा, पण निवडणुका जिंका असं भाजपच्या कार्यकर्त्यांना जणू आदेशच होते.
‘आम्ही जिंकल्यावर तृणमूलच्या कार्यकर्त्यांना रस्त्यांवर कुत्र्यांप्रमाणे गोळ्या मारणार’ अशी चिथावणी खासदार दिलीप घोष यांनी दिली होती. तर, ‘२ मे नंतर तृणमूलचे कार्यकर्ते आमच्याकडे जीवाची भीक मागतील,’ असं यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले होते. या धमकीचा अर्थ काय समजायचा?
हेही वाचा: SBI चा 44 कोटी ग्राहकांना अलर्ट! दोन दिवस बँकेची ऑनलाईन सेवा ‘या’ वेळेला राहणार बंद
ममता बॅनर्जी यांनी बुधवारी दुपारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्या क्षणापर्यंत राज्यात निवडणूक आयोगाचे, म्हणजे केंद्राचेच राज्य होते व कायदा-सुव्यवस्था केंद्रीय सुरक्षा दलाच्या हातात होती. ममता बॅनर्जी यांना काहीच हालचाल करता येऊ नये म्हणून राज्याच्या पोलीस महासंचालकांपासून अनेक अधिकाऱ्यांना निवडणूक आयोगाने हटवले. मग राज्यातील हिंसाचाराची जबाबदारी नक्की कोणाची?
जिथं भाजपचे लोक निवडून आले आहेत त्याच भागात हिंसाचाराच्या घटना घडत आहेत, असं तृणमूलचं म्हणणं आहे. हे खरं असेल तर ममता बॅनर्जी यांना अपशकून करण्यासाठीच बंगालात हिंसाचार घडवला जात आहे काय?
२०१९ मध्ये बंगालात भाजपचे १८ खासदार निवडून आले. त्यानंतर उन्मादी राजकारण सुरू झालं आणि अनेक ठिकाणी तृणमूलच्या कार्यकर्त्यांवर हल्ले केले गेले. प. बंगालची ही परंपरा आहे असं म्हणायचं तर मग रवींद्र संगीत, रवींद्रनाथ टागोर, बंगालची साहित्य-संस्कृती, सामाजिक सुधारणांचा प्रवाह, स्वातंत्र्य लढय़ातील क्रांतीची मशाल हे सर्व वाया गेले काय?