
मुंबई : ही वेळ मंदिर उघडण्याची नाही हे सरकारला वाटत असेल तर समजून घेणं गरजेचं आहे. महाराष्ट्र सरकार कोरोनाला देवाची करणी मानत नाही. या संकटाशी आपल्याला लढायचं आहे हे माहिती असतानाही विरोधक असं वागत असतील तर हे जनतेच्या हिताचं नाही,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे .
राऊत यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांचे नाव न घेता महाराष्ट्र सरकार कोरोनाला देवाची करणी मानत नाही असा टोला लगावला. सरकारकडे मागण्या मांडण्याचा विरोधकांना अधिकार आहे. ते सुद्धा लोकशाहीचे, महाराष्ट्राचे घटक आहेत. भूमिका मांडण्याचा त्यांनाही अधिकार आहे. पण हे करताना भान ठेवलं पाहिजे.
मंदिरं उघडली जावीत ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मनापासून इच्छा आहे. योग्य वेळी निर्णय घेण्याची त्यांची मानसिकता आहे. लोकांच्या जीवाशी खेळ होऊ नये अशी मुख्यमंत्र्यांची भावना असेल तर भूमिका समजून घेतली पाहिजे. विरोधकांनी त्यावर मुख्यमंत्र्यांशी थेट चर्चा केली पाहिजे. रस्त्यावर उतरुन संकट वाढवू नये. संयम बाळगणं गरजेचं आहे,” असंही ते म्हणाले आहेत.

































































































































