नवी दिल्ली : मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे जीडीपी दर पडला. तसेच कोरोना संकट हाताळण्यात केंद्र सरकार अपयशी ठरलं असा गंभीर आरोप काँग्रेस नेते माजी अर्थमंत्री पी.चिदंबरम यांनी केला आहे. (modi-government-shameless- p-chidambaram)
‘मोदी सरकारला कसलीही लाज नाही, ते चुकाही मान्य करत नाहीत’ असं चिदंबरम यांनी बीबीसीशी बोलताना सांगितले. “जीडीपीचा दर पडल्याबद्दल आश्चर्याचा धक्का वगैरे बसलेला नाही. आम्ही सरकारला हाच इशारा देत होतो. जगभरातल्या अर्थतज्ज्ञांनी भारत सरकारला हेच सूचित केलं होतं. तीन दिवसांपूर्वी सादर झालेल्या रिझर्व्ह बँकेच्या अहवालातही हीच गोष्ट अधोरेखित झाली होती. असंही चिदंबरम यांनी सांगितले.
केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाच्या मते 2020 ते 2021 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत एप्रिल ते जून या कालावधीत विकासदर 23.9 टक्क्यांनी कमी झाला आहे. सोमवारी (31 ऑगस्ट) जाहीर करण्यात आलेल्या चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते जून या तिमाहीत भारताचा जीडीपी -23.9 टक्के असल्याचं स्पष्ट झालं. एप्रिल ते जून या काळात देशभरात कोरोना संकट होतं आणि प्रादूर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. आधीपासूनच अर्थव्यवस्थेची वाईट अवस्था असल्यामुळे कोरोनामुळे परिस्थिती आणखी बिघडली.
चिदंबरम म्हणाले, पंतप्रधान आणि अर्थमंत्री वगळता सर्वांना माहित होते की, भारताच्या अर्थव्यवस्थेचे संकट अधिकच खोलवर जाणार आहे. संपूर्ण देश त्याची किंमत मोजत आहे. गरीब निराश झाला आहे. परंतु मोदी सरकार याविषयी निश्र्चिंत आहे. त्यांना त्याची काळजी नाही. सरकारने एक बनावट कथा तयार केली आहे. ज्या वास्तव समोर आले आहे.
चिदंबरम म्हणाले, कोणत्याही अर्थतज्ज्ञाला मोदी सरकारने कोरोनावर उपाययोजनांसाठी उचललेली पावलं योग्य तसंच समाधानकारक असल्याचं वाटत नाही. रिझर्व्ह बँकेचा अहवाल एकदा वाचा. मोदी सरकारने कोरोना काळात योग्य उपाययोजना केल्या आहेत, त्यांना थोडा वेळ द्यावा असं तुम्हाला वाटत असेल, तर देव तुमचं भलं करो. केवळ एकाच क्षेत्रात वाढ दिसून आली आहे, ते म्हणजे कृषी. शेती, वनीकरण आणि मासेमारी या क्षेत्रांमध्ये 3.4 विकास दर आहे,” असं त्यांनी म्हटलं.









































































































































