हिंगोली : काँग्रेसचे नेते, खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रा (Bharat jodo Yatra) शुक्रवारी (ता. ११) सायंकाळी ४.३० वाजता जिल्ह्यातील हिवरा फाटा/चोरंबा फाटा येथे दाखल होणार आहे. यावेळी यात्रेचे स्वागत व अन्य कार्यक्रमांची काँग्रेसतर्फे जय्यत तयारी करण्यात आली आहे. राज्यभरातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारीही शहरात दाखल झाले आहेत. ही यात्रा जिल्ह्यात चार दिवस राहणार आहे.
नांदेड येथील सभा संपल्यावर भारत जोडो यात्रा शुक्रवारी जिल्ह्यात दाखल होणार आहे. जिल्ह्यात चार दिवस थांबल्यानंतर ही यात्रा वाशीम, अकोला, बुलडाणा जिल्ह्यातून मध्यप्रदेशात जाणार आहे. यात्रेच्या स्वागतासाठी नांदेड- हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवर सुरक्षेसह इतरही तयारी पूर्ण झाली आहे.
जिल्ह्यातील हिवरा फाटा/चोरंबा फाटा येथे यात्रेचे स्वागत करण्यात येणार आहे. त्या नंतर ही यात्रा वारंगा फाटा येथे शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजता येणार आहे. येथे राहुल गांधी यांची कॉर्नर सभा होईल. त्या नंतर रात्री दाती पाटीजवळ मुक्काम होणार आहे. नंतर शनिवार (ता. १२), रविवार (ता. १३), सोमवार (ता. १४) अशी चार दिवस यात्रा जिल्ह्यात असेल. मंगळवारी (ता. १५) वडद फाटा येथून पदयात्रेचा पुढील प्रवासासाठी प्रारंभ होईल. त्यानंतर ही यात्रा वाशीम जिल्ह्यात जाणार आहे. यात्रेतील अति महत्त्वाच्या व्यक्तींसाठी जागोजागी शयनकक्षासह भोजनाचे मंडप उभारण्यात आले आहेत.