Independence Day l “स्वातंत्र्य कसे म्हणावे?”, देशाच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनी सामानातून मोदी सरकारला सवाल

Ex-cm-shivsena-uddhav-thackeray-says-amoeba-named-nda-is-still-alive-after-many-years-narendra-modi-news-update-today
Ex-cm-shivsena-uddhav-thackeray-says-amoeba-named-nda-is-still-alive-after-many-years-narendra-modi-news-update-today

मुंबई : आज देश स्वातंत्र्याची (Independence Day) पंचाहत्तरी साजरी करत आहे. ‘आझादी का अमृत महोत्सव’ (Azadi Ka Amtrut Mahotsav) साजरा होत आहे. अश्यात शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामानातून ‘अग्र’सवाल करण्यात आलाय. “स्वातंत्र्य कसे म्हणावे?”, या शीर्षकाखाली हा अग्रलेख लिहिण्यात आला आहे.

हर घर तिरंगा हा उपक्रम केंद्र सरकारच्या वतीने राबवण्यात येत आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत देशभरात वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने सरकारतर्फे ‘ हर घर तिरंगा’ (Har Ghar Tiranga) अभियान राबवण्यात येत आहे. या अभियाना अंतर्गत 13 ते 15 ऑगस्ट असे तीन दिवस सर्वांना आपल्या घरांवर राष्ट्रध्वज फडकवण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला केले आहे. त्यावरच सामनातून सवाल करण्यात आलाय.

 “ब्रिटिशांनी ‘फोडा आणि झोडा’ या अनीतीचा वापर करून हिंदुस्थानवर दीडशे वर्षे राज्य केले. देशातील विद्यमान सरकारही याच कुनीतीचा वापर करून राज्य कारभार करणार असेल तर त्याला स्वातंत्र्य कसे म्हणायचे? देशासमोर समस्या असंख्य आहेत आणि जनतेच्या मनात प्रश्नांचे काहूर माजले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज लाल किल्ल्यावरून स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त देशाला उद्देशून भाषण करतील, त्यावेळी देशातील प्रश्नांविषयी नेमके कोणते अमृतकण शिंपडतील हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरेल!”, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.

स्वातंत्र्य कसे म्हणावे?

हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य दिनाचा अमृतमहोत्सव देशभरात अपूर्व उत्साह आणि धूमधडाक्यात साजरा होतो आहे. 75 वा स्वातंत्र्य दिन प्रत्यक्षात आज असला तरी गेल्या आठवडाभरापासूनच गल्लीपासून दिल्लीपर्यंत शाळकरी मुलांच्या प्रभात फेन्या आणि देशभक्तिपर गीतांचा गजर सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त जगभरात सोहळे करण्याची व देशातील घराघरांवर तिरंगा फडकवण्याची हाक दिली होती. अर्थात देशाचा स्वातंत्र्य दिन म्हणजे राष्ट्राचा मानबिंदू आणि देशभक्तीची अस्मिता जागृत करणारा विषय असल्याने पंतप्रधानांच्या आवाहनाला देशवासीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

गेले काही दिवस देशाच्या कानाकोपऱ्यात तिरंग्याचे वाटप सुरू होते. हे तमाम राष्ट्रध्वज आता घराघरांवर डौलाने फडकत आहेत आणि या उत्सवी सोहळ्यातून देशभक्तीचे एक दिमाखदार वातावरण नक्कीच निर्माण झाले. त्यात यंदाच्या स्वातंत्र्य दिनाचे हे अमृतमहोत्सवी वर्ष असल्याने या वेळच्या स्वातंत्र्य दिनाचा डौल काही औरच आहे. तो असायलाच हवा. मात्र, स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव जल्लोषात साजरा करत असतानच देशासमोर आज जे असंख्य प्रश्न आ वासून उभे आहेत त्यावरही मंथन व्हायलाच हवे.

ज्यांच्यामुळे आपल्याला प्राप्त झाला त्यांचे स्मरण करणे, त्यांचा गौरव करणे हेदेखील आपले आद्य कर्तव्य असले पाहिजे. पण ते आपण पार पाडतो आहोत काय? ज्या काँग्रेस पक्षाने हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यलढय़ाचे नेतृत्व केले त्याच काँग्रेस पक्षाला देशातून हद्दपार करण्याची घोषणा आज वारंवार दिली जाते, याला काय म्हणावे? काँग्रेस पक्षाने ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी सर्वाधिक संघर्ष केला, त्याच काँग्रेसला देशातून मुक्त करण्याचे नारे दिले जात असतील तर हा विद्वेषी विचार देशभक्तीच्या तराजूत मोजायचा तरी कसा? महात्मा गांधी, पंडित नेहरू, मौलाना आझाद, लोकमान्य टिळक, सरदार पटेल, स्वातंत्र्यवीर सावरकर, नेताजी सुभाषचंद्र बोस, अश्फाक उल्ला खाँ, भगतसिंह, राजगुरू अशा असंख्य नेत्यांनी आणि क्रांतिकारकांनी स्वातंत्र्यप्राप्तीसाठी आयुष्याचा होम केला. या सर्वांच्या त्याग व बलिदानामुळे हिंदुस्थानला स्वातंत्र्याची फळे चाखता आली.

नवा इतिहास लिहिण्याचे प्रयत्न गेली काही वर्षे सातत्याने होतो आहे. देशाला खरे स्वातंत्र्य 2014 नंतरच मिळाले, अशी विकृत मांडणी करणारी मंडळी भविष्यात इतिहासाची काय आणि कशी मोडतोड करतील हे आजतरी कोणीच सांगू शकत नाही. केवळ इतिहासच नव्हे तर देशाच्या राज्यघटनेची, लोकशाहीची व प्रमुख सरकारी संस्थानांचीही हवी तशी मोडतोड आज सत्ताधाऱ्यांकडून होते आहे. आर्थिक आघाडीवर देशाची प्रचंड पिछेहाट होताना दिसते आहे. रुपयाचे विक्रमी अवमूल्यन होऊन तो रसातळाला गेला. विकास दरापासून ते जीडीपीपर्यंत सारे आलेख पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळत आहेत… बेरोजगारीचा प्रचंड विस्फोट होतो आहे. चीनने हिंदुस्थानी हद्दीत मोठी घुसखोरी केली असतानाच हिंदुस्थानच्या सैन्यदलातून दोन लाख जवानांना घरी पाठवण्याच्या हालचाली सुरू असतील तर ते स्वातंत्र्य धोक्यात आणण्याच लक्षण आहे.

ब्रिटिशांनी ‘फोडा आणि झोडा’ या अनीतीचा वापर करून हिंदुस्थानवर दीडशे वर्षे राज्य केले. देशातील विद्यमान सरकारही याच कुनीतीचा वापर करून राज्य कारभार करणार असेल तर त्याला स्वातंत्र्य कसे म्हणायचे? देशासमोर समस्या असंख्य आहेत आणि जनतेच्या मनात प्रश्नांचे काहूर माजले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज लाल किल्ल्यावरून स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त देशाला उद्देशून भाषण करतील, त्यावेळी देशातील प्रश्नांविषयी नेमके कोणते अमृतकण शिंपडतील हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरेल!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here