ठाणे l मुंब्रा चुहा ब्रिजवरून मंगळवारी 13 जुलैला खाडीत उडी घेतलेला 22 वर्षीय तरुण प्रवाहाचा अंदाज न आल्याने बुडाला होता. मात्र त्याचा मृतदेह अथक प्रयत्न करूनही तब्बल तीन दिवस हाती लागला नाही. त्यामुळे अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन दलाने शोधकार्य देखील थांबवले. अखेर आज एका मच्छीमाराच्य जाळ्यात आज मृतदेह अडकल्याने तो सापडला. त्यानंतर तो पोलिसांनी पंचनामा करून तो नातेवाईकांच्या ताब्यात दिला.
मृतक अरबाज मैनुद्दीन शेख (22) ठाकूर पाडा, मुंब्रा येथे राहणार होता. या तरुणाने 13 जुलै रोजी चुहा पुलावरून खाडीत उडी घेतली होती. मात्र खाडीच्या पाण्याचा त्याला अंदाज आला नाही. त्यासोबत असणारे त्याचे मित्र पाण्याबाहेर आले मात्र तो आला नाही. म्हणून अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने त्याठिकाणी रेसक्यू ऑपरेशन सुरू केले. मागील तीन दिवस पालिका आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन दल आणि टीडीआरएफ यांनी शोध घेतला मात्र तो सापडला नाही.
मंगळवारी समुद्राला मोठी भरती असल्याने शोध कार्य थांबले. तर 14 जुलै रोजी टीडीआरएफ आणि अग्निशमन दलाने 8 तास शोध घेतला. मात्र रात्री पर्यंत यश लाभले नाही. तसेच गुरुवारी 15 जुलै रोजी टीडीआरएफ आणि अग्निशमन दल पथकाने 2 बोटींच्या मदतीने सकाळी 7 वाजल्यापासून 10 तास शोध घेतला मात्र अरबाजचा मृतदेह सापडला नाही. त्यानंतर देखील शोधकार्य सुरुच होते.
अखेर शुक्रवारी अरबाजचा मृतदेह हा स्थानिक मच्छीमार आणि अग्निशमन दलाला सापडला. अग्निशमन दलाने तो पोलिसांच्या ताब्यात दिला आणि पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.









































































































































