औरंगाबाद: औरंगाबाद महापालिका निवडणूक (Aurangabad Muncipal corporation Election) प्रारूप प्रभाग आराखड्यावर नागरिकांनी 324 सूचना व हरकती दाखल केल्या होत्या. यापैकी केवळ 15 प्रमुख दुरुस्त्या राज्य निवडणूक आयोगाने पालिकेला सूचवल्या होत्या. पालिकेच्या निवडणूक विभागाने त्या दुरुस्त करून अंतिम आराखडा राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केल्याची माहिती मनपाच्या निवडणूक (Muncipal Corporation Election Department) विभागाने दिली.
औरंगाबाद महापालिका निवडणुकीसाठी पहिल्यांदाच प्रभाग पद्धत वापरली जात आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने त्यावेळी हा निर्णय घेतला होता. त्यानुसार पालिकेच्या निवडणूक विभागाने 126 वॉर्डांचे 42 प्रभाग तयार केले आहेत. प्रभागरचनेचा प्रारूप आराखडा व हद्दींचा नकाशा 2 जून रोजी प्रसिद्ध करण्यात आला. 16 जूनपर्यंत हरकती व सूचना स्वीकारण्यात आल्या. 22 जून रोजी मौलाना आझाद संशोधन केंद्रात सुनावणी झाली. आयोगाने सुनावणीसाठी नोंदणी महानिरीक्षक श्रावण हर्डीकर यांची नियुक्ती केली होती. त्यांनी 324 आक्षेपांची सुनावणी घेतली.
आराखड्यात 15 दुरूस्त्या
प्रभागांच्या हद्दींची स्थळ पाहणी करून त्याचा अहवाल सादर करा, असे निर्देश हर्डीकर यांनी दिले होते. त्यानुसार पालिकेच्या अधिका-यांनी स्थळ पाहणी केली. दोनच प्रभागांच्या हद्दींबद्दल तसे आक्षेप होते. त्यामुळे त्या प्रभागांची तर स्थळ पाहणी करण्यात आली. तसेच सर्व प्रभागांच्या हद्दीची स्थळ पाहणी करून तपासून घेण्यात आल्या. काही चुका तर झालेल्या नाहीत ना, याची खातरजमा पालिकेच्या निवडणूक विभागाच्या अधिकार्यांननी केली. त्याचा अहवाल हर्डीकर यांना सादर करण्यात आला. नंतर हर्डीकर यांनी प्रभाग आराखड्यात एकूण 15 दुरूस्त्या सूचवल्या. त्यानुसार पालिकेच्या निवडणूक विभागाने दुरूस्त्या केल्या. आता हा अंतिम प्रभाग आराखडा राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवला गेला आहे.
निवडणूक याद्यांचे काम प्राथमिक सुरू
निवडणूक विभागाने आयोगाच्या सूचनेनुसार मतदार याद्या तयार करण्याचे काम प्राथमिक स्वरूपात हाती घेतले आहे. प्रभाग पद्धतीमुळे आता प्रत्येक प्रभागासाठी एकच मतदार यादी तयार करावी लागेल. यामध्ये मनपाच्या निवडणूक विभागाला चांगलीच कसरत करावी लागणार आहे. एका प्रभागाचे मतदार दुस-या प्रभागात जाणार नाहीत, याची दक्षता घ्यावी लागणार आहे.