मुंबई : उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये दलित तरुणीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली. या घटनेनं देश हादरला आहे. सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. हाथरसमध्ये झालेल्या या सामूहिक अत्याचाराच्या घटनेवर राज्याचे गृहनिर्माण मंत्री व राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी हताश उद्गार काढले आहेत. आव्हाड यांनी ट्विट करत महिलांना दिल्या जाणाऱ्या सन्मानाचा मुद्दा उपस्थित केला आहे.
या घटनेवर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून दुःख व्यक्त केलं आहे. “आपण अशा देशात राहतो, जिथे देवींच्या मूर्तींची पूजा केली जाते आणि त्यांचा आदर केला जातो. हाच आदर आपल्याला देह आणि रक्त असणाऱ्या स्त्रियांबद्दल कधी बघायला मिळणार आहे,” असं म्हणत आव्हाड यांनी हाथरसमधील घटनेवर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
उत्तर प्रदेशमधील हाथरसमध्ये १९ वर्षीय तरुणीवर सर्वण समाजातील चौघांनी सामूहिक बलात्कार केला होता. दोन आठवड्यापूर्वी ही घटना घडली होती. आज उपचारांदरम्यान मृत्यू झाला. दिल्लीच्या सफदरजंग येथील रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु होते. चार सवर्ण तरुणांनी बलात्कार करुन तरुणीची जीभ कापून, तिची मान मोडण्याचं अमानुष कृत्य केलं होतं. या घटनेवर देशभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. त्याचबरोबर महिलांच्या सुरक्षेचा मुद्दाही उपस्थित केला जात आहे.
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड ट्विटमध्ये म्हणाले
We stay in a country where the stone idols of Goddesses are worshipped & respected…
When will we see the same respect for women with flesh & blood…#HathrasHorror#HathrasHorrorShocksIndia— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) September 30, 2020
“आपण अशा देशात राहतो, जिथे देवींच्या मूर्तींची पूजा केली जाते आणि त्यांचा आदर केला जातो. हाच आदर आपल्याला देह आणि रक्त असणाऱ्या स्त्रियांबद्दल कधी बघायला मिळणार आहे,” असं म्हणत आव्हाड यांनी हाथरसमधील घटनेवर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
हे आहे प्रकरण
१४ सप्टेंबर रोजी जनावरांसाठी चारा आणण्यासाठी ही तरुणी आपल्या शेतात गेली होती. या ठिकाणी सवर्ण समाजातील चार तरुणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार करुन तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. रक्तबंबाळ अवस्थेत जेव्हा ही तरुणी घटनास्थळी आढळून आली, तेव्हा तिची जीभ कापलेली होती. तसेच तिच्या मानेवर गंभीर जखमा आढळून आल्या. त्याचबरोबर तिच्या पाठीच्या कण्यालाही गंभीर दुखापत झालेली होती. सध्या या प्रकरणावरून देशात संतापाची लाट उसळली आहे.