मुंबई : अभिनेत्री कंगना रनौत प्रकरणावरुन महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना हिमाचल प्रदेशमधून धमकीचे फोन येत आहेत. आतापर्यंत धमकीचे 9 फोन आलेत आहे.(Threatening phone call to Anil Deshmukh in Kangana Drugs Case). ‘कंगनापासून दूर राहा, तुम्ही चुकीचं केलंय, आतातरी सुधारणा करा’ अशी धमकी देणारे 7 फोन मंगळवारी आले. त्यानंतर आज बुधवारी पहाटे 2 धमकीचे फोन आले. आतापर्यंत गृहमंत्री देशमुख यांना धमकीचे 9 फोन आलेत. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
..अन्यथा वाईट परिणाम होतील
गृहमंत्री देशमुख यांना कंगना प्रकरणावरुन धमकीचं सत्र सुरु झालं आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तींनी देशमुख यांना कंगना रनौतपासून दूर राहण्यास सांगतानाच तिच्याविरोधातील कारवाई थांबवण्याचाही सूचक इशारा दिला आहे. आम्ही जे सांगतो आहे ते आत्ताच लक्षात घ्या आणि सुधरा नाही तर याचे परिणाम वाईट होतील असंही या धमकीच्या फोनमध्ये सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, अभिनेत्री कंगना रनौतची चौफेर कोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे. कंगनाच्या मुंबईतील ऑफिसमध्ये अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी पालिकेकेडून नोटीस पाठवण्यात आली आहे. तर दुसरीकडे ती ड्रग्ज घेत असल्याचा आरोप झाला आहे. त्याशिवाय कंगनाविरोधात विधानसभेत हक्कभंग दाखल करण्यात आला आहे. तर कंगनाची मुख्य भूमिका असलेला एक चित्रपट करण्यास सिनेमॅटोग्राफर पीसी श्रीराम यांनी नकार दिला आहे. त्यामुळे कंगनाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
कंगनावर हे आहेत आरोप
कंगनाने मुंबई आणि मुंबई पोलिसांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यानंतर शिवसेना तसेच इतर राजकीय पक्षांनी तिच्यावर टीका केली होती. नुकतचं कंगना ड्रग्ज घेत असल्याचा आरोप होत आहे. याबाबत शिवसेना आमदार प्रताप सरनाईक आणि सुनील प्रभू यांनी तक्रार दाखल होती. याची चौकशी मुंबई पोलिसांमार्फत केली जाणार आहे, असे देशमुख म्हणाले.



















































































































































































