नवी दिल्ली : नीट आणि जेईई परीक्षेसंबंधी विद्यार्थ्यांशी चर्चा करा आणि त्यांनी सहमती दर्शवल्यानंतरच अंतिम निर्णय घ्यावा, असा सल्ला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला दिला आहे. सरकारने सर्व पक्षांशी चर्चा करत उपाय शोधला पाहिजे. आपला निर्णय विद्यार्थ्यांवर लादता कामा नये. असं मत राहुल गांधी यांनी व्यक्त केलं आहे.
“प्रिय विद्यार्थी, तुम्ही या देशाचं भविष्य आहात आणि…
राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर करोना संकटाचा सामना कऱण्यात असमर्थ ठरल्याचा आरोप केला आहे. राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या ‘स्पीक अप फॉर स्टुडंट सेफ्टी’ मोहिमेअंतर्गत एक व्हिडीओ प्रसिद्ध करत म्हटलं आहे की, “प्रिय विद्यार्थी, तुम्ही या देशाचं भविष्य आहात आणि तुम्हीच भारताला नव्या उंचीवर नेऊ शकता. गेल्या तीन-चार महिन्यात काय झालं हे सर्वांनीच पाहिलं आहे. करोना संकट योग्यप्रकारे हाताळलं नाही असं प्रत्येकाला वाटत आहे. आर्थिक नुकसान झालं. लोकांना यातना सहन कराव्या लागल्या”.
सरकारने तुमच्यावर कोणतीही गोष्ट का लादावी ?
“लोकांना अजून त्रास दिला पाहिजे असं मला वाटत नाही…तुम्ही काही चुकीचं केलं आहे असंही मला वाटत नाही. सरकार असमर्थ ठरल्याचं मला स्पष्ट दिसत आहे. सरकारने तुमच्यावर कोणतीही गोष्ट का लादावी ? सरकारने तुमचं ऐकलं पाहिजे,” असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. सरकारने कोणताही निर्णय चर्चा केल्यानंतरच घेतला पाहिजे असं मत राहुल गांधी यांनी मांडलं आहे.