
औरंगाबाद : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची तुलना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, शरद पवार यांच्याशी करून त्यांचा अपमान केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर अॅट्रा सिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (खरात गट) जिल्हाध्यक्ष मनीष नरवडे यांनी केली आहे.
या संदर्भातील त्यांनी बेगमपुरा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. नरवडे यांनी तक्रारीत म्हटले की, डॉ. आंबेडकर संविधान निर्माते आहेत. त्यांची बरोबरी कोणीही करू शकत नाही. त्यांचा अपमान करण्याचे कृत्य संवैधानिक पदावर विराजमान असलेल्या भगतसिंह कोश्यारी यांना शोभणारे नाही.
ते जाणूनबुजून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करत असल्याचे त्यांच्या भाषणातून निदर्शनास येत आहे. त्यामुळे त्यांच्यावर अॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करून कारवाई करावी. या वेळी शहर अध्यक्ष योगेश उबाळे, पवन पवार, संतोष भिंगारे, संदीप अहिरे, विराज मगरे, करण सोनवणे, स्वप्निल नरवडे, अमोल जाधव आदी उपस्थित होते.