मुंबई: पंतप्रधानांचा कोणताही दौरा असला तरी 15 दिवसांपूर्वीपासूनच सुरक्षेच्या सर्व व्यवस्था पाहिल्या जातात. तीन गुप्तचर यंत्रणांकडून माहिती घेतली जाते. एसपीजी (PM Modi Security Spg) या सर्वांचं कंट्रोल करत असते. एसपीजी गृहखात्यांतर्गत येते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shaha) हे या यंत्रणांचे प्रमुख आहेत. त्यामुळे पंतप्रधानाच्या सुरक्षेमधील त्रुटीबाबत गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तर द्यावे अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे.
टिळक भवन येथे पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, शेतक-यांचे प्रश्न, बेरोजगारी, महागाई, घसरलेली अर्थव्यवस्था, जीवनाश्यक वस्तूंचे वाढलेले दर, भाजपाशासित राज्यातील दलितांवरील अत्याचार यामुळे देशातील जनतेमध्ये भाजपाविरोधात प्रचंड संताप आहे. तीन काळ्या कृषी कायद्यांच्या मुद्द्यावरून पंजाबातील शेतकरी एक वर्षापासून आंदोलन करत आहेत.
आंदोलनादररम्यान 700 शेतक-यांचा मृत्यू असून शेतक-यांमध्ये प्रचंड संताप आहे. त्यामुळं पंजाबमधील त्यांच्या सभेला 500 लोकंही आली नाहीत. यावरून दुसरीकडे लक्ष वळविण्यासाठी पंतप्रधान आपला हवाईदौरा सोडून रोडमार्गे जायला निघाले होते.
मुळात त्यांना सभास्थळी जायचेच नव्हते. त्यामुळे रूपं बदलण्यात तरबेज असणा-या पंतप्रधानांनी काल आपलं एक नविन रूप दाखवून नौटंकी केली. ही बाब पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी समोर आणली असून पंजाब सरकारच्या चौकशीतून दूध का दूध पानी का पानी होईल आणि पंतप्रधान आणि भाजपचा खरा चेहरा जनतेसमोर येईल असे पटोले म्हणाले.
पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांचा विश्वास घात केला. त्याला उत्तर देण्याचं काम शेतकऱ्यांनी केलं आहे. पंतप्रधानांना शेतक-यांच्या रस्त्यात खिळे ठोकले, शेतकऱ्यांना आतंकवादी, दहशतवादी आणि आंदोलनजीवी म्हणून हिणवले. पण शेतक-यांनी आपला लढा सुरु ठेवला आणि हुकुमशाही वृत्तीच्या पंतप्रधानांची घमंड जिरवली शेतकरी लढवय्या असून तुम्हाला सत्तेवरून पायउतार करून घरी बसवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असेही पटोले म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या पत्नी रश्मीताई ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करणा-या भाजपा पदाधिका-याला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यावरून भाजप किती हीन पातळीवर जाऊन राजकारण करत आहे हे समोर आले असून भाजपची विचारधारा महिलाविरोधी असल्याचे सातत्याने दिसून येत आहे. भाजपच्या या गलिच्छ राजकारणाचा आम्ही तीव्र निषेध करतो असे पटोले म्हणाले.
पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पटोले म्हणाले की, सत्ता गेल्यापासून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे संतुलन ढळले आहे. त्यांनी वारंवार तोंड उघडायला लावू नका चे पोकळ इशारे देण्यापेक्षा एकदा तोंड उघडावेच म्हणजे त्यांच्या तोंडात किती हवा आहे ते महाराष्ट्राच्या जनतेला कळेल असा टोला लगावला.