
मुंबई : कंगनाच्या बॉलिवूडमधील ड्रग्जच्या आरोपावरून जेष्ठ अभिनेत्री जया बच्चन या बॉलिवूडच्या बचावासाठी मैदानात उतरल्या आहेत. मंगळवारी संसदेत त्यांनी बॉलिवूडचा बचाव करत बॉलिवूडला बदनाम करणाऱ्यांना चांगलेच सुनावले होते. यानंतर बॉलिवूडमध्ये दोन गट तयार झाले आहेत. काही मंडळी जया बच्चन यांचे समर्थन करत आहेत तर काहींनी त्यांच्यावर टीका केली आहे. यानंतर मुंबई पोलिसांनी सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि राज्यसभेच्या सदस्य,अभिनेत्री जया बच्चन यांना पोलीस संरक्षण दिले आहे.
जुहूमधील बच्चन यांचा बंगला जलसाच्या बाहेर मुंबई पोलिसांनी अतिरिक्त सुरक्षा पुरवली आहे. जया बच्चन यांच्या भाषणानंतर सोशल मीडियावर त्यांच्यावर टीका झाली यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षा देण्यात आली आहे. बॉलिवूडमधील ड्रग्जचा वाद मंगळवारी संसदेत पोहोचला. पावसाळी अधिवेशनाच्या दुसर्या दिवशी खासदार जया बच्चन यांनी ड्रग्जच्या वादातून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.
भाजपचे खासदार रवी किशन यांचे नाव न घेता म्हटले होते की, फिल्म इंडस्ट्रीत नाव कमावणारे इंडस्ट्रीलाच गटार म्हणत आहेत. मला आशा आहे की सरकारने अशा लोकांना अशी भाषा न वापरण्यास सांगावे. ‘जया बच्चन म्हणाल्या की काही लोकांमुळे आपण संपूर्ण इंडस्ट्रीची प्रतिमा खराब करू शकत नाही. मला लाज वाटते की काल चित्रपटसृष्टीतील लोकसभेतील आमच्या एका सदस्याने त्याविरूद्ध भाषण केले. हे लाजीरवाणे आहे. आपण ज्या ताटात जेवतो त्यातच छिद्र करु शकत नाही.’ असे जया बच्चन म्हणाल्या होत्या.








































































































































