मुंबई : कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने आयोजित परीक्षांकरिता महत्वाचा निर्णय घेतला आहे. उमेदवारांच्या आरोग्याच्या, सुरक्षिततेच्या दृष्टीने काही सूचना तसेच उपाययोजना सांगण्यात आल्या आहेत. आयोगाकडून परिपत्रक काढण्यात आले असून, उमेदवारांना या सूचनांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे.
ह्या सूचनांचे पालन करा
परीक्षा उपकेंद्रामध्ये प्रवेश करताना उमेदवाराने किमान तीन पदरी कापडाचा मास्क परिधना करणे अनिवार्य असणार आहे.
परीक्षा कक्षामध्ये मास्क, हातमोजे व सॅनिटाईझरची लहान पिशवी असलेले प्रत्येकी एक किट उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याचा वापर उमेदवारांनी दोन्ही सत्राकरिता(असल्यास) करणे अनिवार्य आहे.
परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान उमेदवारांनी स्वच्छता तसेच आरोग्यास हितावह वातावरण राखण्यासाठी हात सतत सॅनिटाईझ करणे आवश्यक आहे.
कोविड सदृश्य लक्षणे जसे की ताप, सर्दी, खोकला इत्यादी आढळून येत असल्यास संबधित परीक्षा उपकेंद्रावरील पर्यवक्षकीय अधिकारी, कर्मचारी यांना अगोदर कळवणे बंधनकारक असणार आहे. शिवाय उमेदवारांनी आरोग्य सेतू अॅप डाउनलोड करणे देखील हिताचे असेल असे कळवण्यात आले आहे.
याचबरोबर उमेदवारांनी स्वतःचा जेवणाचा डबा व पाण्याची बाटली सोबत आणावी, दोन पेपरच्या मधल्या काळात उमेदवारांना परीक्षा उपकेंद्राबाहेर जाण्यास मनाई असणार आहे.
परीक्षा केंद्रात एकमेकांचे शैक्षणिक साहित्य पेन, पेन्सिल आदी वापरण्यास सक्त मनाई असणार आहे.
सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्याच्या दृष्टीने परीक्षा उपकेंद्रावरील माहिती फलक, सांकेतिक चिन्ह, भित्तिपत्रिका इत्यादीवरील सूचनांचे उमेदवारांनी पालन करावे.
असे देखील कळवण्यात आले आहे. कोविड-१९ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने केंद्र व राज्य शासन तसेच स्थानिक प्राधिकरणाकडून वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या सर्व सूचना/आदेश यांचे काटेकोरपणे पालन करावे. असे आयोगाकडून जारी करण्यात आलेल्या परिपत्रकात सांगण्यात आले आहे.




















































































































































































