फडणवीसांकडून महाराष्ट्राची दिशाभूल, अपयश झाकण्याचा प्रयत्न – आदित्य ठाकरेंचा गंभीर आरोप

aaditya-thackeray-slams-devendra-fadnavis-over-tata-airbase-and-many-projects-transfer-from-maharashtra-to-gujrat-news-update-today-update

मुंबई : राज्यात येणारे सर्व औद्योगिक प्रकल्प हे शिंदे-फडणवीस सरकारमुळे (Shinde Fadnavis Government) गुजरात आणि इतर राज्यात जात असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येतोय. विरोधकांच्या या आरोपांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन कागदपत्रांसह उत्तर दिलं. पण त्यांच्या या पत्रकार परिषदेला युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी उत्तर दिलंय. फडणवीस यांनी टाटा एअरबस प्रकल्पाबाबत बोलताना अधिकाऱ्यांचा उल्लेख केला होता. राज्यातील वातावरण प्रकल्पासाठी पोषक नसल्याचं अधिकारी म्हणाल्याचं फडणवीस म्हणाले होते. त्यांच्या या विधानावर आदित्य ठाकरेंनी त्यांना थेट आव्हानच दिलं आहे. त्यांनी टाटा कंपनीच्या त्या अधिकाऱ्यांचं नाव जाहीर करण्याचं आव्हान दिलं आहे.

 महाराष्ट्राचं हक्काचं इतर राज्यांना का दिलं जातंय? राज्यातातील वातावरण हे टाटा एअरबस प्रकल्पासाठी पोषक नाही हे कोणत्या टाटाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं? त्यांनी टाटांच्या त्या अधिकाऱ्यांचं नाव सांगावं, असं आव्हान आदित्य ठाकरेंनी फडणवीसांना दिलं. तसेच मुख्यमंत्र्यांनी समोरासमोर येऊन बोलावं, असंदेखील ते म्हणाले.

समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनासाठी निवडणुकीची का वाट पाहत आहेत. मुख्यमंत्र्यांचे कार्यकर्ते त्याच मार्गाने आले होते. मग हा महामार्ग सर्वसामान्यांसाठी कधी सुरु होणार? असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला.

आदित्य ठाकरे  काय म्हणाले?

“प्रेस कॉन्फरन्सची ही टेस्ट मॅच व्हायला लागली आहे. आम्ही दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील उद्योग कसे मागे पडत चालले आहेत याबाबत माहिती दिली होती. त्यावर उपमुख्यमंत्र्याकडून उत्तर आलं आहे. अपेक्षित हेच होतं की राज्याचे जे प्रमुख असतात, साधारणपणे मुख्यमंत्री त्यांच्याकडून ते अपेक्षित होतं. पण या सिस्टिममध्ये, या घटनाबाह्य सरकारमध्ये जास्त पॉवर कोणाकडे आहे ते स्पष्ट झालं आहे”, असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला.

“एक चांगलं झालं, उपमुख्यमंत्र्यांनीच पत्रकार परिषद घेतल्याने माईक खेचायची, चिठ्ठी देण्याची किंवा कानात सांगण्याची मेहनत करावी लागली नाही. जे उत्तर मुख्यमंत्र्यांकडे अपेक्षित होतं ते उत्तर इथून आलं आहे. कदाचित मुख्यमंत्री देखील हे उत्तर देतील. मी हीच अपेक्षा करतो की, मुख्यमंत्र्यांनी या विषयावर बोलावं. भलेही स्क्रिप्टमधून येत असेल, वाचून बोलले तरी त्यांनी बोलावं कारण ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत, घटनाबाह्य सरकार असलं तरीही”, असा घणाघात त्यांनी केला.

‘दुसऱ्याचे आकडे घेऊन घटनाबाह्य सरकार बनवण्यात काही लोक माहीर’

“आज सर्वप्रथम त्यांनी सांगितलं की, केंद्र सरकारने 2 हजार कोटींचं इलेक्ट्रॉनिक हब महाराष्ट्राला दिलं आहे. आतापर्यंत मी ऐकत होतो, आपल्या राज्यात येणारे अनेक उद्योग निघून गेल्यानंतर आम्हाला गाजर दाखवण्यात आलं होतं की, वेदांता फॉक्सकॉन पेक्षा मोठा उद्योग महाराष्ट्राला मिळेल. आम्ही आकड्यांबाबत खेळ करु शकत नाही. कारण त्यामुळे आमचं राज्यातील सरकार पडलं असेल. आकडे दुसऱ्याचे घेऊन घटनाबाहेर सरकार कसं बनवायचं याच्यात काही लोकं माहीर असतात. घटनाबाह्य सरकार तीन महिने कंस टिकवायचं याचे काही लोक जादुगार असतात. त्यांनी आकड्यांचा खेळ केलेला आहे”, अशी खोचक टीका आदित्य ठाकरेंनी केली.

“मला हे माहिती नव्हतं की 1 लाख 49 हजार कोटींपेक्षा जास्त मोठा आकडा हा 2 हजार कोटीचा आहे. आतापर्यंत आम्हाला सांगितलं जात होतं की दीड लाख कोटी कुठे आणि दोन हजार कोटी कुठे. ठीक आहे, प्रत्येक पैसा हा महत्त्वाचाच आहे. पण जेव्हा स्वत: देवेंद्र फडणवीस किंवा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा दोन हजार कोटींच्या गुंतवणुकीची घोषणा करायचे नाहीत. कारण त्या लेव्हला मोठ्या-मोठ्या घोषणा व्हायच्यात. या सगळ्या गोष्टी रेग्युलरली येतात. आम्ही ज्याचा आवाज उचलतोय त्या गोष्टी राज्यात क्वचितच येऊ शकतात. त्यामध्ये वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प, मेडिकल डिव्हाईल, टाटा एअरबस सारख्या प्रकल्पांचा यात समावेश आहे”, असं ते म्हणाले.

“त्यांनी सगळे कागदपत्रे दाखवल्यानंतर आम्हीदेखील आमच्याकडचे पुरावे आणले आहेत. सोशल मिडियावर एक फोटो व्हायरल होतोय की त्यामध्ये आमच्या सरकारने आणलेल्या प्रकल्पावर दावा केला जातोय”, असं आदित्य म्हणाले.

‘फॉक्सकॉनचे दोन वेगवेगळे प्रकल्प होते’

 “मी कधीही इतकं खोटं बोलणं ऐकलं नव्हतं जेवढं आजच्या पत्रकार परिषदेत बोलण्यात आलं. उपमुख्यमंत्र्यांना चुकीची माहिती मिळाली आहे. जानेवारी 2020 ची बातमी त्यांनी दाखवली आहे. पण त्यांनी ती बातमी नीट वाचली नाही. फॉक्सकॉन प्रकल्पाचं 2016 मध्ये मॅग्नेटिक महाराष्ट्रामध्ये सही केलेलं होतं. फॉक्सकॉनने तामिळनाडूत जागा बघितली, त्यानंतर ते अमेरिकेला गेला. तिथे त्यांचं प्रोडक्शन सुरु झालं. महाराष्ट्रात पाच वर्ष न आल्यामुळे त्यांनी एमओयू झाल्यानुसार निवडलेली जागा लॅप झालेली. त्याचंच उत्तर सुभाष देसाई यांनी दिलं होतं. त्या फॉक्सकॉनमध्ये आणि वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पात जमीन आसमानचा फरक आहे. वेदांचा फॉक्सकॉन प्रकल्प सेमीकंडक्टर चीफसाठी होता. मोबाईल फोनसाठी नव्हता. माझी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की, कृपया महाराष्ट्राला दिशाभूल करण्याचा प्रयत्न करु नका. बदनामीचा प्रयत्न सोडून द्या. दोन वेगवेगळे प्रस्ताव होते”, असा दावा आदित्य ठाकरेंनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here