मुंबई : अभिनेत्री कंगना रनोटने मुंबई पोलिसांची तुलना माफियांसोबत केली. मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीस हे सक्षम पोलिस दल आहे. त्याची तुलना स्कॉटलंड यार्ड पोलिसांसोबत केली जाते. अशा पोलिसांविषयी एखादी अभिनेत्री बोलत असेल तर योग्य नाही. त्यांना जर सुरक्षित वाटत नाही तर त्यांनी मुंबईत किंवा महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही. असं विधान महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं आहे.
कंगनाने मुंबईची पाकव्याप्त काश्मीरशी तुलना केल्यानंतर सर्वच स्तरातून कंगनावर जोरदार टीका होत आहे. मराठी कलाकारांसोबतच बॉलिवूड सेलेब्रिटींनीही तिच्यावर निशाणा साधला आहे. तसेच राजकीय नेत्यांकडूनही तिच्यावर टीका केली जात आहेत.
काय म्हणाली होती कंगना
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपल्याला मुंबईत न येण्याची धमकी दिली असून मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी का वाटू लागली आहे अशी टीका कंगनाने ट्विटरवरुन केली होती. तिने ट्विट करत लिहिले होते की, ‘ आधी झळकलेले आझादीचे फलक आणि आता मिळत असलेल्या उघड धमक्या यामुळे मुंबई पाकिस्तानव्याप्त काश्मीरसारखी का वाटू लागली आहे?’