
मुंबई l राज्यातील शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. राज्यातील कॉलेज, महाविद्यालये दिवाळीनंतर सुरु करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि टास्क फोर्सशी (TasKs force) चर्चा करुन कॉलेज सुरु करण्याबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली आहे.
सीईटीच्या परीक्षा पुढे ढकलल्यास कॉलेज सुरु करण्यास विलंब होण्याची शक्यता असल्याचेही उदय सामंत यांनी सांगितले आहे. राज्यातील कमी कोरोना प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्यांमध्ये कॉलेज नोव्हेंबरपासून सुरु करण्याबाबत विचार असून लवकरच याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती सामंत यांनी दिली आहे.
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उद्य सामंत यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी राज्यातील कॉलेज सुरु करण्याबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली आहे. उदय सामंत यांनी म्हटलं आहे की, कॉलेजचे शैक्षणिक वर्ष सुरु होत आहे. १ नोव्हेंबरपासून प्रत्यक्षात महाविद्यालये सुरु करणार असल्याची चर्चा सुरु आहे.
तर १ नोव्हेंबरपासून शैक्षणिक वर्ष सुरु करण्याचे युजीसीचे म्हणणे आहे. पण त्याच कालावधीत आपल्याकडे दिवाळीचा सण आहे. त्यामुळे दिवाळीचा सण गेल्यानंतर कॉलेज सुरु करण्याची परिस्थिती आहे. किती टक्क्यांमध्ये कॉलेज सुरु करण्यात येणार याबाबत विचार सुरु आहे. परंतु दिवाळीनंतर प्रत्यक्षात कॉलेज सुरु करण्याचा निर्णय घेणार असल्याचे उदय सामंत यांनी म्हटलं आहे.
१० ऑक्टोबरला सीईटीच्या पुन्हा परीक्षा
राज्यात अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सीईटीची परीक्षा देणं शक्य झालं नाही. ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही अशा विद्यार्थ्यांना येत्या ९ आणि १० ऑक्टोबरला सीईटीच्या परीक्षा पुन्हा ठेवण्यात आल्या आहेत. त्या परीक्षा पुन्हा पुढे गेल्या तर कॉलेज सुरु करण्यास विलंब होईल. विद्यार्थ्यांनी चिंता करण्याची आवश्यकता नाही. सीईटीच्या परीक्षांचे निकाल लागत नाही तोपर्यं कॉलेज सुरु करण्यास वेळ लागण्याची शक्यता असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्याने यायचे की नाही हे त्यांच्यावर राहणार आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे पालकांच्या आणि विद्यार्थ्यांना मनात भीती आहे. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर हे निर्णय घेण्यात येणार आहेत. आता तरी सध्या ऑनलाईन शैक्षणिक वर्ष सुरु करण्याचा प्रयत्न आहे. ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. त्या ठिकाणी कॉलेज सुरु करण्याबाबत टास्क फोर्स आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन निर्णय घेण्यात येणार असल्याचे उदय सामंत यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा
…ही वेळ आणीबाणीची आहे,राज ठाकरेंनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना लिहिलेलं पत्र वाचा जसंच्या तसं!























































































































































