मुंबई : महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने ‘आरे’मधील वादग्रस्त मेट्रो कारशेड इतरत्र हलवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आवश्यक ती तयारी झाल्याची माहिती समोर येत आहे. आरे मध्ये ज्या ठिकाणी 2 हजार वृक्षांची कत्तल करण्यात आली होती. त्या ठिकाणी पर्यावरणाशी संबंधित ‘वाईल्ड लाईफ फॉरेन्सिक लॅब’ किंवा ‘वाईल्ड लाईफ रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर’ उभारण्याची सरकारची तयारी आहे. (Wild life research centre at Arey Forest)
देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळामध्ये आरे जंगलामध्ये कारशेडला विरोध झाला होता. नागरिक रस्त्यावर उतरले होते. विरोध करणा-या लोकांना तुरुंगात टाकले होते. परंतु तत्कालीन फडणवीस सरकारने दोन हजार झाडांची कत्तल करुन आरेमध्ये कारशेड उभारू हा हट्ट धरला होता. परंतु सत्तांतर झाल्यामुळे महाविकास आघाडी सरकारने तो निर्णय बदलला अशी माहिती समोर येत आहे.
‘आरे’मधील मेट्रोची कारशेड पहाडी गोरेगाव येथे हलवण्याबाबत आवश्यक ती तयारी करण्याचे ते निर्देश मेट्रोच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यानुसार कामही सुरु करण्यात आले आहे. मात्र, या आदेशानंतर आरेच्या ज्या जागेवर वृक्षतोड करण्यात आली आहे त्या जागेचे काय करायचे असा प्रश्न उपस्थित झाला. त्यानंतर या जागेवर पर्यावरणाशी आणि विशेषतः जंगलाशी संबंधित काम चालावे, अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे अशीही माहिती समोर येत आहे.
‘आरे’मध्ये ‘वाईल्ड लाईफ फॉरेन्सिक लॅब’ ?
वन्यप्राण्यांवर वाघांवर तस्करीच्या हेतून विषप्रयोग झाला. सापळ्यात अडकवून ठार मारले गेले. त्यांच्यावर बंदूकीचा किंवा इतर हत्यारांचा वापर केला गेल्यास त्यांच्या मृत्यूंची कारणमिमांसा करण्यासाठी त्यांचे अवशेष हैद्राबाद येथील वाईल्डलाईफ फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवावे लागतात. मात्र संबंधित तपासणी महाराष्ट्रातच व्हावी या हेतूने ही प्रयोगशाळा आरेमध्ये उभी करण्याच्या दृष्टीकोनातून सरकारची तयारी सुरु आहे.
‘वाईल्ड लाईफ रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर’?
राज्यात अद्ययावत वाईल्ड लाईफ रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटरही या ठिकाणी उभारता येईल. त्यामुळे यादृष्टीने प्रस्ताव तयार करुन तो सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री ठाकरे यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. विशेष म्हणजे या जोडीने वाईल्ड लाईफ वेटरनरी हॉस्पिटलचा पर्याय देखील पडताळून पाहता येईल, अशी सूचना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली. त्यानुसारही आवश्यक ती माहिती घेऊन प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.
आरेमध्ये होणार होता कुलाबा वांद्रे सिप्झ मेट्रो 3 चा कारशेड
कुलाबा वांद्रे सिप्झ मेट्रो 3 ची कारशेड आरेमध्ये करण्याबाबत तत्कालीन फडणवीस सरकारने निर्णय घेतला होता. यानंतर मेट्रोच्या कामासाठी येथील वृक्षांची कत्तल करावी लागणार होती. त्याशिवाय प्रकल्पाचे काम पुढे सरकणार नव्हते. मात्र याला पर्यावरणवाद्यांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला.