नवी दिल्ली: मी भाजपा (BJP) आणि आरएसएसला (RSS) गुरु मानत असून ते जेवढ्या आक्रमकपणे माझ्यावर टीका करतील, तेवढा काँग्रेस पक्षाला फायदा होईल, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी दिली आहे. शनिवारी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बोलताना, अखिलेश यादव यांनी ‘भारत जोडो’(Bharat Jodo Yatra) यात्रेत सहभागी होण्याबाबत केलेल्या विधानावरही त्यांनी उत्तर दिलं.
नेमकं काय म्हणाले राहुल गांधी?
“भाजपाने माझ्यावर आक्रमकपणे टीका करावी, अशी माझी इच्छा आहे. त्यांच्या या टीकेमुळे काँग्रेस पक्षाला आपली विचारधारा समजण्यास मदत होईल. माझ्यावर जेवढी टीका होईल, तेवढा काँग्रेस पक्षाला फायदा होईल. त्यामुळे एकप्रकारे मी भाजपाला माझा गुरू मानत असून त्यांच्यामुळेच मला आयुष्यात काय करू नये, याची शिकवण मिळते”, अशी खोचक टीका राहुल गांधी यांनी केली.
भारत जोडो यात्रेबाबत बोलताना ते म्हणाले, “ही यात्रा जेव्हा आम्ही सुरू केली. तेव्हा ती साधारण यात्रा होती. मात्र, त्यानंतर हळू-हळू या यात्रेत लोकं जुळत गेली. आज ही यात्रा सर्वसामान्यांचा आवाज बनली आहे. देशातील विरोधीपक्षदेखील आमच्या बरोबर आहेत. मला कल्पना आहे की राजकीय मतभेदांमुळे काही लोकं या यात्रेत सहभागी होत नाहीत. मात्र, आमची विचारधारा एक आहे”, असेही ते म्हणाले.
दरम्यान, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी काँग्रेसची तुलना भाजपाशी करत मला भारत जोडो यात्रेस सहभागी होण्याचं निमंत्रण नाही, असे म्हटले होते. याबाबत विचारलं असता, “भारत जोडो यात्रेचे दरवाजे सर्वांसाठी खुले आहे. कोणीही या यात्रेत सहभागी होऊ शकतं. अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी दिली.

























































































































































