मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्चपासून मुंबईत लोकल रेल्वे बंद आहेत. लोकल सेवा सुरू करा, या मागणीसाठी विरार रेल्वे स्थानकात सोमवारी प्रवाशांनी उत्स्फुर्तपणे आंदोलन केले. हजारो प्रवाशांनी घोषणा दिल्या. रेल्वे रुळावर आणि परिसरात उतरले होते. यावेळी पोलिसांनी संतप्त नागरिकांना शांत करण्याचा प्रयत्न केला.
लोकल रेल्वे सेवा केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरू आहे. त्यामुळे खासगी कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एसटी बसेसमधून मुंबईला जावे लागते. मात्र या बसेसची संख्या कमी असून कार्यालयात पोहोचण्यासाठी वेळ लागतो. रात्री घरी परततांना उशीर होतो. काही प्रवाशांनी तर घरी पोहचण्यासाठी रात्री दोन वाजतात. त्यामुळे प्रवाशामंध्ये असंतोष होता.
सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास हजारो प्रवासी विरार रेल्वे स्थानक परिसरात जमा झाले आणि रुळांवर उतरले होते. उपनगरीय रेल्वे सुरू करा अशी मागणी करत त्यांनी घोषणा दिल्या. काही वेळाने पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. यापुर्वी २२ जुलै रोजी देखील नालासोपार रेल्वे स्थानकात संतप्त प्रवाशांनी आंदोलन केले होते.
एसटी बसेसची संख्या कमी असते. मुंबईत जातांना वाहतूक कोंडी आणि लांबंचे अतंर यामुळे कार्यालयात वेळेवर पोहोचता येत नाही, परिणामी पगार कापला जातो, रात्री घरी पोहचण्यासाठी उशीर होतोय. असे आंदोलनकर्त्या महिलांनी यावेळी सांगितले.