
कराड | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार vijay wadettiwar यांनी कराड दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस CM Devendra Fadnavis, पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Narendra Modi, पंकजा मुंडे pankaja Munde आणि सुनेत्रा पवार sunetra pawar यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यांमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संभाव्य पंतप्रधानपदाबाबत विचारलेल्या प्रश्नावर वडेट्टीवार म्हणाले, “मराठी माणूस देशाचा पंतप्रधान झाला तर महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. मात्र, त्यासाठी दिल्लीतील दोन गुजराती नेत्यांना हटवावे लागेल.” त्यांच्या या विधानानंतर राजकीय प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे.
यावेळी त्यांनी भाजपवर ज्येष्ठ नेत्यांना डावलल्याचा आरोप करत पंकजा मुंडे यांना काँग्रेसमध्ये येण्याचे खुले निमंत्रण दिले. “त्या काँग्रेसमध्ये आल्या तर त्यांना राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्याची संधी देऊ,” असे ते म्हणाले.
सुनेत्रा पवार यांच्याविषयी सुरू असलेल्या “गुंगी गुडिया” वादावरही वडेट्टीवार यांनी भूमिका मांडली. हा शब्द अपमानास्पद नसून त्याचे राजकारण केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच सुनेत्रा पवार यांनी आपल्या कर्तृत्वातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करावी, असेही ते म्हणाले.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या छायाचित्राला जोडे मारण्याच्या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांवरही टीका केली. “ज्यांना खऱ्या प्रश्नांवर बोलायचे आहे, त्यांच्यापर्यंत जाण्याची हिंमत काहींमध्ये नाही,” असा टोला त्यांनी लगावला.
वडेट्टीवार यांच्या या वक्तव्यांनंतर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले असून, त्यांच्या विधानांवर भाजप आणि महायुतीतील नेते काय भूमिका घेतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.




















































































































































