नवी दिल्ली : केंद्र सरकारनं सार्वजनिक कंपन्यांतील गुंतवणूक काढून घेण्याचा सपाटाच सुरू केल्याचं दिसत आहे. तब्बल २६ कंपन्यांचं खासगीकरण करण्याच्या दिशेनं पावलं टाकली आहेत. यातील २३ कंपन्यांना केंद्रानं मंजूरी दिली आहे. त्यातच आता भारतीय जीवन विमा महामंडळ अर्थात एलआयसीतील सरकारची २५ टक्के भागीदारी विकणार आहे. यामुळे काँग्रेसचे नेते खा. राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्ला चढवला आहे.
मोदीजी, सरकारी कंपनी विका मोहीम चालवत आहेत. स्वतःच निर्माण केलेल्या आर्थिक अरिष्टाची भरपाई करण्यासाठी देशाची संपत्ती थोडी थोडी करून विकली जात आहे. जनतेचं भविष्य आणि विश्वास बाजूला ठेवून एलआयसीला विकणं मोदी सरकारचा आणखी एक लज्जास्पद प्रयत्न आहे,” अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.
निर्गुंतवणुकीच्या धोरणावर जोर देत सरकारनं आधीच काही सार्वजनिक कंपन्यातीली हिस्सेदारी विकली आहे. आता आणखी २६ कंपन्यांचं खासगीकरण करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी याची घोषणा केली आहे. या निर्णयावरून काँग्रेसनं मोदींना लक्ष्य केलं आहे.