मुंबई : देशात घडणाऱ्या महत्त्वपूर्ण घटनांवर आता बॉलिवूड सेलिब्रिटींनी आपलं मौन सोडलं पाहिजे, असं मत शिवसेना खासदार (Shiv Sena MP) प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी मांडलं. हे मौन त्यांची रक्षा करू शकत नाही, असंही त्या म्हणाल्या. उज्जैनमध्ये नुकत्याच घडलेल्या घटनेबाबत त्यांनी ट्विट केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच्या (Narendra Modi) सेलिब्रिटींच्या भेटीचाही फोटो त्यांनी या ट्विटमध्ये पोस्ट केला आहे.
अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे त्यांच्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी उज्जैनमधल्या महाकालेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेले. मात्र तिथपर्यंत जाऊनही त्यांना मंदिरात देवाचं दर्शन घेता आलं नाही. मंदिराबाहेर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून निदर्शनं करण्यात आली. त्यामुळे रणबीर-आलियाने मंदिरात जाऊन दर्शन न घेण्याचा निर्णय घेतला.
प्रियंका चतुर्वेदी यांचं ट्विट-
This selective protest before every movie release has become an industry& a lobby, if not collectively pushed back we are fast heading into an abyss of hate,fear& silence. The entertainment industry is an employment generator, lakhs depend on it. Speak up. https://t.co/tLpybJ7JjF
— Priyanka Chaturvedi🇮🇳 (@priyankac19) September 7, 2022
सोशल मीडियावरील बॉयकॉट ट्रेंडवरही त्या अप्रत्यक्षपणे व्यक्त झाल्या. मोदींसोबतचा सेलिब्रिटींचा फोटो शेअर करत त्यांनी लिहिलं, ‘यांसारखे फोटोशूट तुमची काहीच मदत करू शकणार नाही, जर तुम्ही राजकारणावर व्यक्त होणं हे आपलं काम नाही असं समजून वागलात आणि तिरस्काराकडे मूक प्रेक्षक बनून पाहिलात. या घटना तुमच्या मागे येणारच. उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिराबाहेर निदर्शनं हे त्याचंच एक उदाहरण आहे. राजकारणातील गोष्टी अशा घाणेरड्या गोष्टींकडे वळत असल्याची लाज वाटते.’
रणबीरने एका जुन्या मुलाखतीत गोमांसबद्दल वक्तव्य केल्याने त्यांच्या चित्रपटावर बहिष्कार घालण्याची मागणी होतेय. याच कारणामुळे महाकालेश्वर मंदिराबाहेर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी रणबीर-आलियाविरोधात निदर्शनं केली होती.
“प्रत्येक चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी होत असलेला हा ठराविक विरोध म्हणजे एक प्रकारची लॉबी झाली आहे. जर एकत्रितपणे याला विरोध केला नाही तर आपण वेगाने द्वेष, भीती आणि शांततेच्या अथांग डोहात बुडत जाऊ. मनोरंजनविश्वातून अनेकांना नोकऱ्या मिळतात. लाखो लोक त्यावर अवलंबून आहेत. त्यामुळे उठा आणि त्याविरोधात बोला”, असंही चतुर्वेदी म्हणाल्या.