मुंबई : मोहम्मद अली जिनांना (Muhammad Ali jinnah) पंतप्रधान केले असते तर देशाची फाळणी टळली असती, पण काँग्रेसच्या नेत्यांनी ते होऊ दिले नाही’ असे एक बालिश, खोडसाळ व अज्ञानमूलक विधान संघाचे स्वयंसेवक, अर्ध-विचारवंत शेषाद्री चारी (Seshadri Chari) यांनी केले आहे. परंतु इतिहास असा आहे की फाळणी टाळण्याच्या उद्देशाने खुद्द महात्मा गांधींनी जिनांना स्वतंत्र भारताचे पंतप्रधान होण्याची विनंती केली, गळ घातली, ऑफर दिली होती, ती जिनांनी धुडकावून लावली होती, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. रत्नाकर महाजन (Dr. Ratnakar Mahajan) यांनी म्हटले आहे.
शेषाद्री चारी यांच्या विधानाचा समाचार घेताना डॉ. महाजन पुढे म्हणाले की, एवढी वर्षे इतिहासातील एक खलपुरुष म्हणून ज्यांची निर्भर्त्सना केली, ज्यांच्या मजारवर जाऊन गुणगौरव केला म्हणून लालकृष्ण अडवाणींना दूषणं दिली त्या जिनांचा आज अचानक एवढा पुळका चारींना का आला? संघाला व फाळणी विरोधी हिंदुत्ववादी लोकांना असे वाटत होते तर मग सावरकर-गोळवलकरांनी त्यासाठी काय प्रयत्न केले? असे प्रश्नही महाजन यांनी विचारले.