औरंगाबाद : पोलीस भरतीची तयारी करत असलेल्या तरुणांसाठी राज्य शासनाने आनंदाची बातमी देत राज्यभरात १८ हजार ३३१ जागांसाठी पोलीस भरतीची अधिकृत घोषणा करुन भरती प्रक्रियेची शासनस्तरावर जाहिरात प्रकाशित केली होती. त्यात बॅन्ड्समनची पदे वगळण्यात आल्याने त्याचा समावेश करावा आणि महाराष्ट्र कारागृह सेवानिवृत्त पोलीस कर्मचार्यांच्या पाल्यांना आरक्षण द्यावा. अशी मागणी खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz jaleel) यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे केली. तसेच पोलीस महासंचालक व औरंगाबाद पोलीस आयुक्तांना पत्र दिले.
सेवानिवृत्त कारागृह पोलीस कर्मचार्यांच्या पाल्यांनी आणि पोलीस विभागात बॅन्ड्समन पदांकरिता सराव करत असलेल्या युवक व युवतींनी खासदार इम्तियाज जलील यांची भेट घेवुन सविस्तर माहिती दिली; युवकांच्या भवितव्याचा विचार करुन खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी त्वरीत सबब प्रकरणी पत्र पाठविले.
खासदार इम्तियाज जलील यांनी निवृत्त कारागृह पोलीस कर्मचार्यांच्या पाल्यांसंबंधी दिलेल्या पत्रात नमुद केले की, महाराष्ट्र पोलीस भरतीच्या अटी, शर्ती व नियमाप्रमाणेच सन २०१५-१६ मध्ये कारागृह पोलीस भरतीची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. तसेच वर्ष २००३ पासून महाराष्ट्र पोलीस व कारागृह पोलीस यांचे सर्व प्रकारचे भत्ते, विविध योजना समान करण्यात आलेले आहे. दोन्ही विभागातील कर्मचार्यांचे कामाचे स्वरुप जवळपास समानच असल्याचे कारागृह पोलीस कर्मचार्यांच्या पाल्यांनी निदर्शनास आणुन दिलेले आहे.
महाराष्ट्र पोलीस विभागातून सेवानिवृत्त व मयत पोलीस कर्मचार्यांच्या पाल्यांना पोलीस भरतीत यापूर्वी आरक्षण दिलेले आहे. त्याच धर्तीवर आगामी होत असलेल्या पोलीस शिपाई भरतीत सेवानिवृत्त महाराष्ट्र कारागृह पोलीस कर्मचार्यांच्या पाल्यांना सुध्दा आरक्षण हवे असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी नमूद केले.
महाराष्ट्र शासनातर्फे पोलीस शिपाई संवर्गातील विविध पदे भरती करणेसंबंधी राज्यस्तरावर जाहीरात प्रसिध्द करण्यात येते. त्यामध्ये पोलीस शिपाई संवर्गात चालक, खेळाडू, बॅन्ड्समन, पोलीस पाल्य व इतर यांच्यासाठी काही पदे राखीव असते. यावर्षी सुध्दा महाराष्ट्र शासनातर्पेâ पोलीस शिपाई संवर्गात विविध पदांची भरतीची जाहीरात प्रकाशित करण्यात आली आहे. त्यामध्ये बॅन्ड्समन हे पद वगळण्यात आले असल्याचे बॅन्ड्समन या पदाकरिता अनेक वर्षापासुन मेहनत करत असलेल्या युवक-युवतींनी निदर्शनास आणुन दिल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी बॅन्ड्समन संबंधी गृहमंत्री यांना दिलेल्या पत्रात नमूद केले.
महाराष्ट्र राज्यात अनेक होतकरु तरुणांनी विविध संगीत संस्था मधुन संगीताचे प्रशिक्षण घेवुन महाराष्ट्र पोलीस दलात सामील होऊन नावलौकीक वाढविण्याचे निश्चित केलेले होते. परंतु अचानक बॅन्ड्समन पदे वगळण्यात आल्याने त्यांच्या भवितव्यावर प्रश्न चिन्ह उपस्थित झाल्याचे पत्रात नमूद केले.