औरंगाबाद : केंद्रातील सत्ताधा-यांच्या कारभारामुळे देशापुढे अनेक प्रश्न गंभीर स्वरुपात उभे राहिले आहेत. वर्षानुवर्षे गुण्यागोविंदाने नांदणा-या या देशातील काही समाजघटकांना सतत भीतीच्या छायेखाली ठेवण्याचे प्रयत्न होत आहेत. समाजामध्ये फूट पाडण्याचे तसेच विद्वेष निर्माण करण्याचे काम सत्तेच्या माध्यमातून केले जात आहे. घटनात्मक संस्थांचे खच्चीकरण करण्याची मोहीम राबवली जात आहे. लोकशाही पद्धतीने आवाज उठवणा-या विद्यार्थ्यांपासून अभ्यासकांपर्यंतच्या विविध घटकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. प्रसारमाध्यमांची मुस्कटदाबी सुरू आहे. असा आरोप राष्ट्रवादीचे नेते औरंगाबादचे संपर्क प्रमुख मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत केला.
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्यावतीने ४ आणि ५ नोव्हेंबर २०२२ रोजी शिर्डी येथे राज्यातील प्रमुख कार्यकर्त्यांसाठी राष्ट्रवादी मंथन : वेध भविष्याचा या दोन दिवसीय अभ्यास शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती टोपे यांनी पत्रकार परिषदेत दिली. पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे वर्तमान स्थितीसंदर्भातील आकलन वाढावे, भविष्यातील आव्हानांचा वेध घेण्यासाठी त्यांनी सज्ज व्हावे आणि राष्ट्र तसेच समाजाबद्दलची बांधिलकी भक्कम व्हावी, या उद्देशाने शिबिराचे आयोजन केले असे टोपे म्हणाले.
पुढे बोलताना टोपे म्हणाले की, सोशल मीडियाच्या माध्यमातून पगारी ट्रोल्सच्या टोळ्या पोसून पत्रकारांपासून कलावंतांपर्यंत विविध घटकांचा छळवाद मांडला जात आहे. आर्थिक आघाडीवर प्रचंड अपयश आले असून त्यापासून समाजाचे लक्ष भलतीकडे वळवण्यासाठी विविध क्लृप्त्या लढवण्यात येत आहेत. २०१४ पूर्वी रुपयाच्या घसरणीचा ठपका तत्कालीन पंतप्रधानांवर ठेवणारे लोक आता रुपयाच्या अभूतपूर्व घसरणीचेही लंगडे समर्थन करू लागले आहेत.
बेरोजगारीच्या संकटाने अक्राळविक्राळ स्वरूप धारण केले असून त्याबाबत कुठल्याही टप्प्यावर गांभीर्य दिसत नाही. महागाई आकाशाला भिडली असून त्यामुळे सामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. शिक्षणापासून सांस्कृतिक क्षेत्रापर्यंत इतिहासाचे विकृतीकरण खरून खोटा इतिहास थोपवण्याचे प्रयत्न सतेच्या माध्यमातून सुरू आहे. अनेक पातळ्यांवरचे अपयश लपवण्यासाठी धार्मिक मुद्द्यांच्या आड लपण्याचा प्रयत्न केला जात आहे.
शिबिरामध्ये पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते, राज्यातील विविध क्षेत्रातील विचारवंत, अभ्यासक मार्गदर्शन करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना होऊन तेवीस वर्षे झाली असून येत्या जून महिन्यामध्ये पक्ष रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण करेल. असे ही टोपे यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, शहराध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन, प्रदेश उपाध्यक्ष इलियास किरमाणी, सचिव मुश्ताक अहमद, कय्यूम शेख, जावेद खान, शेख बब्बू हे उपस्थित होते.