नवी दिल्ली l यंदाच्या वर्षी CBSE च्या दहावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केला आहे. त्यासोबतच बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचं केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने जाहीर केलं आहे.cbse-board-10th-class-exams-canceled-12th-exams-postponed-news-updates
वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना हा मोठा दिलासा मानला जात आहे. दरम्यान, दहावीच्या परीक्षा रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका आणि ११वीच्या प्रवेशांचं काय? अशी चर्चा सुरू झाली असून त्यांच्या गुणपत्रिका ऑब्जेक्टिव्ह क्रायटेरियानुसार तयार करण्यात येणार असल्याचं केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
१ जून रोजी CBSE घेणार परिस्थितीचा आढावा!
केंद्रीय शिक्षण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर CBSE परीक्षांबाबत हा निर्णय घेण्यात आला आहे. दहावीच्या रद्द करण्यात आलेल्या परीक्षांनंतर त्यांच्या गुणपत्रिकांसाठी सीबीएसई बोर्डाकडून विशिष्ट प्रणाली तयार केली जाणार आहे.
हेही वाचा: CBSE Board Exam 2021: सीबीएसई की 12वीं की परीक्षा टली, 10वीं की रद्द! ,
मात्र, यामध्ये नेमक्या कोणत्या बाबींचा समावेश असेल? वर्षभरात झालेल्या परीक्षांचे गुण आधारभूत मानले जाणार आहेत का? याविषयी सविस्तर माहिती मिळू शकलेली नाही. दरम्यान, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून आता १ जून रोजी CBSE कडून करोना परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार आहे.
महाराष्ट्र सरकारने याआधीच महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा जून महिन्यात तर बारावीच्या परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. राज्यातल्या करोनाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन यासंदर्भातला निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
११ एप्रिल रोजी होणाऱ्या MPSC च्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यभरातून दहावी आणि बारावीच्या परीक्षा देखील पुढे ढकलण्याची मागणी केली जात होती. या आधारावर प्रशासकीय अधिकारी, पालक वर्ग आणि शिक्षण तज्ज्ञ यांच्याशी चर्चा करून परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याचं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केलं आहे.