नाशिक: काँग्रेस नेतृत्त्वानं एकेकाळी संपर्क करुन आपल्याला मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट अन्न व नागरी पुरवठामंत्री (Food and Civil Supplies Minister) आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) केला आहे. मात्र ओबीसींच्या न्याय्य हक्कांसाठी शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहण्याचा निर्णय घेतला होता,असंही त्यांनी म्हटलं आहे.
अन्न व नागरी पुरवठामंत्री आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांचा आज वाढदिवस आहे. आज त्यांनी 75 व्या वर्षात पदार्पण केलं आहे. त्या निमित्त एका कार्यक्रमात भुजबळ बोलत होते त्यावेळी त्यांनी जुन्या गोष्टींना उजाळा दिला.
मी शिवसेना आणि काँग्रेस सोडली नसती तर आज मुख्यमंत्री नक्कीच झालो असतो, अशी भावना छगन भुजबळांनी व्यक्त केली आहे. ज्यांच्या सभेत आपण भाषणं दिली, ते आज मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री झाले आहेत.
माझे अनेक सहकारी पुढे गेले. मी मुख्यमंत्री किंवा केंद्रीय मंत्री होऊ शकलो नाही. त्याबद्दल आता खंत व्यक्त करण्यात अर्थ नाही, असं छगन भुजबळ म्हणाले आहेत. तसंच मी शिवसेना किंवा काँग्रेस सोडली नसती तर आज नक्कीच मुख्यमंत्री झालो असतो, अशी भावनाही त्यांनी यावेळी बोलून दाखवली.
शिवसेना सोडतानाचा काळ सर्वांत कठीण होता, अशी भावना त्यांनी बोलून दाखवली. पण ओबीसींच्या न्याय्य हक्कांसाठी मला शिवसेना सोडावी लागली, असंही त्यांनी बोलून दाखवलं आहे.
हेही वाचा
Mumbai local Trains l आजपासून अठरा वर्षांखालील मुलांना रेल्वे प्रवासमुभा